“पिढी जात संस्कृतीचा वारसा जपण्याची आज गरज”–अशोक नखाते
![]()
“पिढी जात संस्कृतीचा वारसा जपण्याची आज गरज”–अशोक नखाते
जळगांव प्रतिनिधी
कुटुंब व्यवस्थेतील हरवत जाणारा संवाद आणि बोलका होणारा भ्रमणध्वनी आज समाज मनाला आव्हानात्मक दिशा देऊ पाहतोय अशा वेळी पिढी जात संस्कृतीचा वारसा जपण्याची गरज असून बालगुंजन कवितासंग्रह बालकांच्या मनातल्या गूज गोष्टी मांडत असल्याचे मत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सुनिता नारखेडे येवले लिखित अथर्व पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या बालगुंजन कवितासंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री माया धूप्पड तर प्रमुख अतिथी भीमरमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, बालगृह अधीक्षक रवीकिरण अहिरराव, अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे नितीन विसपुते विचार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवयित्री सुनिता नारखेडे येवले यांनी केले. याप्रसंगी बोलताना डॉ. मिलिंद बागुल म्हणाले साहित्यातला बाल वांग्मय प्रकार हाताळणे तसे जिकरीचे आणि जोखमीचे काम आहे, बाल मनाचा वेध घेणारी कविता बालकांना गोडी लावणारी, आनंद देणारी कविता लिहिणं हे सगळ्याच साहित्यिकांना जमेल असं नाही परंतु ज्या ज्या साहित्यिकांनी बाल मनाला आपल्या साहित्याची गोडी लावली त्या त्या साहित्यिकांनी आपल्या जीवनात खरा साकारला आहे हे निश्चित लक्षात येते. नव्या पिढीला आजी आजोबा दुरापास्त झाले आहेत, एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होतोय. विभक्त कुटुंब पद्धती वेगाने मार्गक्रमण करते आहे यात असणारा धोका नेमका संस्कारांचा अभाव आहे आणि यामुळेच समाज पद्धती आता बदलू पाहतेय आणि हे निश्चितपणे नात्यात दुरावा निर्माण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे मत त्यांनी मांडले. अध्यक्षस्थानावरून बोलताना कवयित्री माया धूप्पड यांनी बालकांच्या एकूणच दैनंदिनी ही आजच्या काळात बदलत जाणारी आहे पालकांनी लहानग्यांच्या हातात रडणं थांबवण्यासाठी दिलेला मोबाईल आज त्याचं भविष्य अंध:कारमय करू पाहतेय यासाठी कुटुंब व्यवस्थेत सजगता येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले त्यांनी याप्रसंगी आपल्या बालकविता देखील त्यांनी सादर केल्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा महाले यांनी तर आभार प्रवीण पाटील यांनी मानले. बाल निरीक्षण गृहात झालेल्या या कार्यक्रमास पी. झेड.नारखेडे सर,सागर येवले, दीक्षा येवले,श्रुती येवले, तुषार वाघुळदे,संजय पाटील, संजय येवले, योगिनी येवले,प्रकाश येवले, विद्यार्थी, विद्यार्थांनी,कर्मचारी अन्य मान्यवर उपस्थित होते.

