आजच्या तरुणांनी शिवरायांच्या विचारांवर चालणे गरजेचे -सौ. सुनिता मोरे यांचे प्रतिपादन
![]()
आजच्या तरुणांनी शिवरायांच्या विचारांवर चालणे गरजेचे -सौ. सुनिता मोरे यांचे प्रतिपादन
अमळनेर प्रतिनिधी : आजची तरुण पिढी ही भरकटत चालली आहे अशा वेळी रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांच्या विचारांवर चालण्याची गरज निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन वक्त्या सौ. सुनिता हृदयनाथ मोरे यांनी येथे केले.
युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचालित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या अंतर्गत शिवजयंती निमित्त आयोजित व्याख्यानात येथील के. डी . गायकवाड हायस्कूल येथे त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आनंदराव नेतकर होते.
शिवराय हे परस्त्रीला मातेसमान मानायचे आणि आज आपण पाहतो आहे की सगळीकडे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुंडगिरी वाढली आहे, अशा परिस्थितीत शिवरायांचे विचारच आपल्याला तारू शकतात. शिवजयंती केवळ नाचून नव्हे तर वाचून साजरी करणे आवश्यक आहे. शिवरायांनी कधीही जातीभेद केला नाही. त्यांच्या सैन्यात सर्व जातींचे मावळे होते अनेक मुस्लिम सैनिक त्यांचे अत्यंत निष्ठावंत होते त्यांचे अंगरक्षकही होते बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींना सोबत घेऊन शिवरायांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. आपल्या खास शैलीतून आणि सोप्या पद्धतीने सौ. सुनिता ताई यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी विस्तृत विवेचन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील पाटील सर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार श्रीमती मोरे मॅडम यांनी केला. यावेळी जी एस पाटील सर, मयूर बागल सर, पी आर पारधी मॅडम, विसपुते सर आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

