अमळनेरमध्ये ‘ग्रंथोत्सव 2024’: साहित्यप्रेमींना अनोखी पर्वणी!**
![]()
**अमळनेरमध्ये ‘ग्रंथोत्सव 2024’: साहित्यप्रेमींना अनोखी पर्वणी!**
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जळगांव व परम पूज्य साने गुरुजी ग्रंथालय आणि मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम टाऊन हॉलच्या पटांगणावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीचा शुभारंभ हा ह.भ.प.प.पू. श्री प्रसाद महाराज यांच्या आशीर्वादाने आणि आमदार श्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथदिंडीसह शालेय वाचनालये सुरु करण्यासाठी अनेक प्रकाशनांचे स्टॉल ग्रंथ विक्रीसाठी आणि प्रदर्शनासाठी दोन्ही दिवस उपलब्ध असतील. कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश आहे.
यानंतर, सकाळी ११ वाजता ग्रंथोत्सव व उद्घाटन समारंभ जलसंपदा मंत्री मा. श्री गिरीशजी महाजन यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान केंद्रिय राज्यमंत्री क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मा. श्रीमती रक्षाताई खडसे भुषवणार आहेत. प्रमुख अतिथींमध्ये पालकमंत्री मा. श्री गुलाबराव पाटील, लोकसभा सदस्य श्रीमती स्मिताताई वाघ, जळगाव जिल्ह्यातील विधानसभा सदस्य, जिल्हाधिकारी व ग्रंथालय संचालक उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या सत्रात, दुपारी ३ वाजता ‘अहिराणी वैभव’ या विषयावर डॉ. एस के पाटील यांचे प्रबोधनात्मक प्रवचन होईल. सायंकाळी ५ वाजता श्री मयूर देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांद्वारे “महाराष्ट्रातील थोर संतांच्या जीवनावरील संगीतमय भारुड” प्रस्तुत केले जाईल.
रविवार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी, सकाळच्या सत्रात प्राध्यापक महेंद्र गणपुले सर यांचा ‘हास्यनगरी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने ग्रंथालयाची वाटचाल’ या विषयावर जळगाव महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री हितेश ब्रिजवासी यांचे विचार मांडले जातील. तसेच, साहित्यिक व दीर्घकाळ सेवा देणाऱ्या ग्रंथपालांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
यासाठी सर्व वाचक प्रेमींना या अद्भुत कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी माननीय श्री सुहास रोकडे, जिल्हा ग्रंथालय संघ, अमळनेर तालुका ग्रंथालय संघ, तसेच पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष श्री दिलीप सोनवणे आणि चिटणीस श्री प्रकाश वाघ यांनी केले आहे.
हा ग्रंथोत्सव एक अविस्मरणीय अनुभव देणार आहे, त्यामुळे आपल्या उपस्थितीत या साहित्य पर्वणीचा आनंद घ्या!


