संविधान देशाचा आत्मा : डॉ विजय तुंटे यांचे प्रतिपादन
![]()
संविधान देशाचा आत्मा :
डॉ विजय तुंटे यांचे प्रतिपादन
—————————————–
अमळनेर : 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन निमित्ताने पंडित जवाहलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय,अमळनेर यांच्या वतीने संविधान दिन अथवा संविधान दिनाचा उपक्रम ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. केंद्र व राज्य शासन यांच्या आदेशानुसार 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून अनेक उपक्रमाच्या माध्यमातून राबविण्याचे धोरण ठरले. त्याचाच एक भाग म्हणजे विविध स्वरूपाच्या उपक्रमातून संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याची भूमिका उच्च शिक्षण प्रक्रियेत झाली पाहिजे ही विचारधारा लक्षात घेऊन महाविद्यालयाने 26 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4:30 वाजता आभासी पद्धतीने गुगल मीट द्वारे *भारतीय संविधानाचे महत्त्व आणि उद्देश पत्रिकेचा अन्वयार्थ* या विषयावर संसाधन व्यक्ती म्हणून प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख तथा उप प्राचार्य डॉ. विजय तुंटे यांनी संविधान दिनाचे महत्त्व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले,प्रारंभी 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, सामान्य नागरिक,एनआरआय यांना श्रद्धांजली वाहण्यात अली.
या प्रसंगी डॉ.तुंटे म्हणाले की,*राज्यघटना व्यक्ती व शासन यांच्यातील एक सुसंवाद आहे, कोणत्याही देशाचा आत्मा हा त्या त्या देशाचा संविधान असतो*. संविधानात राज्य- व्यक्ती-समाज एकत्रित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणून *संविधान म्हणजे या देशाचा राज्यकारभार चालविण्याची एक लिखित नियमावली किंवा संहिता असते* ज्यामध्ये लोककल्याणाची तरतूद आणि घटनाकारांचे मूल्यांचा आदर्श देखील आढळतो. भारतीय संविधान हे अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे, घटनेचे भाष्यकार अमेरिकन न्यायाधीश कारटोझो असे म्हणतो की, *राज्यघटना केवळ आजच्या वर्तनाचे नियम सांगणारी संहिता नाही,तर भविष्यकाळात लागू होणाऱ्या अशा तत्त्वांची एक संहिता आहे* म्हणून भारतीय संविधान हे जनतेने स्वीकारलेले व त्यांच्या इच्छा नुसार चालणारे संविधान आहे, संविधानात ज्या काही तरतुदी अंतर्भूत आहेत त्याचा सारांश हे सरनामा किंवा उद्देश पत्रिकेमध्ये आढळते.ही उद्देश पत्रिका 13 डिसेंबर 1946 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीत जो *उद्दिष्टांचा ठराव* मांडला त्यावर आधारलेला असा सरनामा मसुदा समितीने स्वीकारलेले निदर्शनास येते.
म्हणून भारतीय संविधान आणि त्या अंतर्गत असणारी उद्देश पत्रिका विविध स्वरूपाच्या अनुच्छेदांचा अर्थ लावीत असतो. या उद्देश पत्रिकेत आपला देश कसा आहे ? संविधानाने आपणाला काय दिले ? नागरिकाकडून संविधानाची काय अपेक्षा आहे ? याबाबतची माहिती अथवा त्याची विवेचन शब्दबद्ध रूपाने आढळते.
प्रस्तुत स्वरूपाच्या आभासी व्याख्यानात पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील,ज्येष्ठ प्राध्यापक विजय वाघमारे त्यांच्या समवेत सागर कोळी आणि असंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
प्रस्तुत आभासी व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर कोळी यांनी केले तर आभार प्रा.विजय वाघमारे यांनी मानले.

