कनिष्ठ महाविद्यालयांतील कला शाखा ऑक्सीजनवर. (विशेष बाब म्हणून कला शाखेच्या तुकडीसाठी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी.- जुक्टो संघटनेची मागणी.)
![]()
कनिष्ठ महाविद्यालयांतील कला शाखा ऑक्सीजनवर.
(विशेष बाब म्हणून कला शाखेच्या तुकडीसाठी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी.- जुक्टो संघटनेची मागणी.)
*जळगाव:सध्या संपूर्ण जिल्ह्यात उच्च शिक्षणासाठी प्रवेशाची धावपळ सुरू आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही इ.१०वीचा भरघोस निकाल लागल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. इ.११वीची प्रवेश प्रक्रिया आता जवळपास अंतिम टप्यात असून पुढील आठवड्यात जिल्ह्यात ११वीच्या प्रत्यक्ष वर्ग अध्यापनास सुरुवात होणार आहे. चांगल्या निकालामुळे पुरेशी विद्यार्थी संख्या प्रत्येक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांत असेल असे प्रारंभी चित्र होते.*
*मात्र इ.१०वी ला जेमतेम उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील विज्ञान शाखेतच प्रवेश मिळावा म्हणून आग्रही असल्याने वाणिज्य विशेषतः कला शाखा मरणासन्न अवस्थेतून मार्गक्रमण करीत असल्याचे विदारक चित्र सध्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेले आहे. कला शाखेकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन, पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून कला शाखेला दिला जाणारा दुय्यम दर्जा यामुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात कला शाखेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही उ.मा.वि./क.म.विं.मध्ये मंजूर विद्यार्थी संख्येइतकेदेखील प्रवेश आजअखेरही न झाल्याचे भीषण वास्तव आहे. प्रवेशाची हीच स्थिती यापुढेही कायम राहिल्यास नजीकच्या भविष्यात बरेचसे शिक्षक अत्यावश्यक कार्यभाराअभावी अतिरिक्त होण्याचे मोठे संकट निर्माण झालेले आहे.*
*कला शाखेला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच या विद्याशाखेचे अस्तित्व टिकविण्यासाठी शिक्षण विभागाने पर्यायाने शासनाने विनाविलंब धोरणात्मक निर्णय घेऊन वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात १२० ऐवजी ६० तसेच माध्यमिक संलग्न असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात ८० ऐवजी ४० इतकी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी अशी आग्रही मागणी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे प्रा.नंदन वळींकार (अध्यक्ष), प्रा.सुनील सोनार (सचिव), प्रा.डी.डी.पाटील, प्रा.सुनील गरुड (जेष्ठ मार्गदर्शक), डॉ.अतुल इंगळे, राजेंद्र तायडे,गजानन वंजारी, पी.पी.पाटील, प्रा.राजेश भटनागर (उपाध्यक्ष), प्रा.राजेंद्र चव्हाण, प्रा.डी.जी.चिकटे (सहसचिव), प्रा.शैलेश राणे,प्रा.सुनील पाटील (कार्याध्यक्ष) राहुल वराडे, मनोज पाटील, पी.ओ.चौधरी यांच्यासह समस्त जिल्हा कार्यकारिणीने केली आहे.*

