घरनं झाय थोडं, याहिनी धाडं घोडं,साक्री रोडना बुंगारा कोण बुजी बरं !
![]()


घरनं झाय थोडं, याहिनी धाडं घोडं,साक्री रोडना बुंगारा कोण बुजी बरं !
साक्री रोड व विद्यावर्धिनी परिसर म्हणजे समस्यांचा महासागर होय. परिसरात 40हून अधिक वसाहतीसाठी इनमिन चार सफाई कामगार आणि साडेतीन अधिकारी. केवळ सफाई कामगारांना दोष देता येणार नाही. आरोग्य, पाणी, वीज यांच्या असंख्य समस्या असतांनाच आज विद्यावर्धिनीच्या उद्धवस्त शॉपिंग कॉम्पलेक्ससमोर साक्रीरोडच्या मध्यभागी एक खड्डा पडला आहे. ज्याला अहिराणीत ‘बुंगरं’ म्हणता येईल पण लक्ष कोण देणार? पण ऐकतय कोण? जवळच दुर्वा सोडा गाडी लावणारा आमचा मित्र देविदास वाडीले पैलवान व ऋतु मेन्स पार्लरचे चालक वसंत चित्ते यांना कल्पना सूचली आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या बुंगऱ्यावर एक बावटा गाडला आणि पादचाऱ्यांना अपघात होऊ नये म्हणून काळजी घेतली. आधीच एव्हढ्या समस्या त्यात हे ‘बुंगरं’ म्हणजे ‘घरनं झायं थोडं आणि याहिनी धाडं घोडं’ असेच म्हणावे लागेल.
या बुंगऱ्याच्या आड खाली मोठे खड्डे असल्याचे समजले. एखादे वजनदार वाहन आल्यास कधीही त्यात अडकून मोठा अपघात होऊ शकतो. तेथे मला एक ओळखीचा दारुबाज भेटला आणि तो मला म्हणाला, ‘‘दादा, या बुंगराना आडे कोणातरी बापजादानी त्यानं डबोलं दपाडेल व्हई’’. मी त्याला डबोलं शोधण्याचा सल्ला देऊ शकलो नाही. साक्री रोड झगमगाट झाला त्याचे श्रेय घेण्याची नेत्यांमध्ये स्पर्धा लागली होती. परिसरातील अनेक नेते ‘हर्ष’भराने हर्षोल्लीत होऊन दावे-प्रतिदावे करीत होते. या रस्त्याच्या कामाशी संबंध असणारे अनेक अधिकारी, कर्मचारी, नेते याच परिसरात राहतात मग या याहिनी धाडेल घोडं आडावानी जबाबदारी कोणी? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांनी केला आहे.

