नायगाव येथील १० मार्च रोजी पहिले राज्यस्तरीय महिला अधिवेशनाची जय्यत तयारी परीपुर्णतेसह लक्षवेधी
![]()

नायगाव येथील १० मार्च रोजी पहिले राज्यस्तरीय महिला अधिवेशनाची जय्यत तयारी परीपुर्णतेसह लक्षवेधी
[ सावित्रीच्या लेकींनी उचलला अधिवेशन यशस्वीतेचा एकजुटीने गोवर्धन ]
सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक समाज संघ आयोजित राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे होत आहे.त्या निमित्ताने सेवा त्याग आणि समर्पण वृत्तीने महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाच्या समस्त क्रियाशील कार्यकर्त्या तसेच समविचारी संघटनेतील महिला भगिनी एकजुटीने कुटूंबाची जबाबदारी सांभाळून तसेच अक्षरशः भुक तहान विसरून अधिवेशन यशस्वीतेसाठी जिवाचे रान करीत आहे.सत्यशोधक समाज महिला संघ आयोजित पहिलेच अधिवेशन ऐतिहासिक व संस्मरणीय व्हावे,नविन अभ्यासू कार्यक्षम व निर्भय माता भगिनीं कार्यकर्त्यांची भक्कम व अतूट फळी निर्माण होण्याचे उद्दिष्टे संमेलन पूर्वीच पूर्णत्वास येत असल्याचा सुखद प्रत्यय अधिवेशनाच्या सर्वस्तरीय जय्यत तयारी बघून येत आहे अशी सहर्ष भावना संमेलनाचे मुख्य संयोजक तथा सत्यशोधक संघाचे राज्य संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार यांनी आमचे महाराष्ट्र सारथी दैनिकाचे विशेष प्रतिनिधी तथा संमेलनाचे प्रसिद्धी प्रमुख विजय लुल्हे यांच्याशी सुसंवाद साधतांना व्यक्त केल्या.
नियोजनानुसार संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वागत समिती, निष्पादन समिती,संयोजन समिती,प्रसिद्ध समिती नियुक्त करून अहोरात्र नियोजनबद्ध कार्यवाही डोळ्यांत तेल घालून स्वागत समिती अध्यक्षा साधना नेवसे, कार्याध्यक्षा रुपाली इंगोले, संयोजिका उज्ज्वला तांबे एकदिलाने,अदम्य जिद्दीसह अचूकतेने करीत आहेत.नोकरी,व्यवसाय, गृहोद्योग व कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्याची कसरत करूनही सावित्रीच्या लेकींनी केलेल्या कामांनी आम्ही थक्क झालो नव्हे अवाक् झालो ! अशी सहर्ष भावना सत्यशोधक समाज संघ संस्थापक अरविंद खैरनार व सचिव डॉ.सुरेश झाल्टे यांनी प्रतिनिधी लुल्हे यांच्याकडे व्यक्त केली.
कार्यकारी समितीन्वये कार्यकर्त्यांनी केलेली दखलपात्र कामे
संमेलनाच्या संयोजिका शिवमती उज्ज्वला तांबे म्हणाल्या की, ‘ अधिवेशनाची तयारी ९९ % पुर्ण झाली आहे.तांबे पुढे म्हणाल्या की,’ स्वागत समिती अध्यक्षा तथा नायगाव सरपंच साधना नेवसे यांच्या नेतृत्वात शुभांगी नेवसे,वैशाली नेवसे,रूपाली नेवसे,माधुरी नेवसे,जगन्नाथ नेवसे,विशाल नेवसे,सुवर्णा पळशीकर मंडप उभारणी तसेच सुसज्ज व्यासपीठ आणि संमेलन परिसर स्वच्छतेसाठी अथक परिश्रम घेत आहेत.महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून दिनांक ९ मार्च रोजी कार्यक्रमास सायंकाळी ७ वाजेच्या ‘ मी सावित्री बोलतेयं …. ‘ या वैशाली धाकुलकर (अमरावती ) निर्मित / अभिनित एकपात्री प्रयोग आणि रात्री ८.१५ वाजेच्या ‘ सावित्री बाई फुले महिलांसाठी दिपस्तंभ ‘ या व्याख्यानासाठी उपस्थित राहून खंडाळा मुक्कामासाठी येणाऱ्या कार्यकर्त्या भगिनींची निवास व भोजनाची सर्वतोपरी सोय व्हावी यासाठी विराज मल्टीपर्पज हॉलचे प्रोप्रायटर गायकवाड यांच्यासह खंडाळा येथील बिनीच्या कार्यकर्त्या वसुधा जाधव,महेंद्र गाढवे,सुप्रिया ननावरे,नारायण बळवंत डोळ्यांत तेल घालून विशेष परिश्रम घेत आहेत.फलटण पाडेगाव येथील कार्यकर्ते गिरीष बनकर,प्रशांत डावरे,सनी रायकर,किरण गोते, अजित विधाते अविरत मेहनत करीत आहेत. अधिवेशनाचे फ्लेस लक्षवेधी व वाचनीय होऊन नजरेत भरावे यासाठी नायगावकडे येणारे प्रमुख हमरस्ते व नायगाव गावात प्रथम दर्शनी बॅनर लावण्यासाठी डॉक्टर सुदर्शन गोरे,महादेव कांबळे, फजल फरास,संतोष तांबे, इजमत पटेल,संदेश यादव, किरण मोरे कार्यकर्ते जिवाचे रान करीत आहे.अधिवेशनासाठी परिसरातील महिलांमध्ये प्रचार व प्रसाराचे कार्य शिरवळ येथील ध्येयवेड्या सत्यशोधिका अंबिका देशमाने,ज्योती तायडे,छाया जाधव झपाटल्यागत कामे करीत आहेत.अधिवेशनास बहुसंख्येने उपस्थित राहण्यासाठी महिलांना सातत्यानेआवाहन करीत आहेत.अधिवेशनाला येणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणत्याही सुविधांची उणिव भासू नये ; एकही समस्या येता कामा नये यासाठी लोणंद येथील कार्यकर्ते आर्थिक नियोजन तथा पुरेशा लोकवर्गणी संकल्पपूर्तीसाठी ध्यासाने संजय करपे,अजित जाधव,अनिल तांबे,महादेव क्षिरसागर,प्रदीप क्षिरसागर पायाला भिंगरी लावून अध्यक्ष अरविंद खैरनार यांच्या मार्गदर्शनानुसार अविश्रांत जनसंपर्क करीत आहेत.
विविध संघटना व संस्थांचे अभूतपूर्व योगदान
महाराष्ट्रातून अनेकविध सत्यशोधक महिला संघ,सत्यशोधक ओबीसी परिषद,महासंघ,अ.भा.फुले समता परिषद,संत शिरोमणी सावता माळी समाज मंडळ, माळी समाज सेवा संस्था,माळी सेवा संघ,सावित्रीबाई फुले महिला मंडळ,आम्ही सावित्रीच्या लेकी,क्रांतीज्योती महिला संघटना,भारतीय बौद्ध महासभा संघर्ष वहिनी,जिजाऊ ब्रिगेड, विदर्भ तेली समाज,गुरुदेव सेवाश्रम मंडळ,समाजक्रांती यांसह विविध समविचारी संघटना यांनी संमेलन यशस्वी करण्याचा विडा उचलला असून त्याप्रमाणे बेभानपणे कार्यवाही करीत आहेत.अशी माहिती अधिवेशन तथा सामाजिक कार्यकर्त्या श शिवमती उज्वला तांबे ( शिरवळ ) यांनी प्रतिनिधी लुल्हे यांना दिली.
[ फुलेप्रेमी अजीत जाधव यांचा प्रतिमा व पुस्तक भेट देण्याचा प्रेरक संकल्प
फलटण येथील महात्मा फुले प्रेमी अजीत जाधव यांनी प्रेरणादायी संकल्प केला आहे. अधिवेशनातील उपस्थित भगिनींना ते महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा मोफत वितरण करणार आहेत तसेच मान्यवरांना ‘ क्रांतीज्योती ‘ काव्य संग्रह (संपादित ) – संपादक – रासकर , जाधव, गार्डे हे पुस्तक सप्रेम भेट देणार आहेत. ]
कार्याध्यक्ष रूपाली इंगोले ( उद्योजिका पुणे ) सुसंवादात म्हणाल्या की , ‘ पहिल्या महिला अधिवेशनास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विविध स्तरातून ज्येष्ठ तसेच उत्साही नुतन कार्यकर्त्या बहुसंख्येने येवून क्रांतीज्योती सावित्रीमाईच्या जन्म तपोभूमीला अभिवादन करण्याचे पुर्णसंचित मिळावे आणि कार्यऊर्जा घेऊन उपेक्षित,वंचित व पददलीत अन् अन्यायग्रस्त आबालवृद्ध स्त्रियांच्या उन्नती,व्यावसायिक व शैक्षणिक समृद्धीसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्यात विधायक अहमहमिका लागली आहे.
अधिवेशनाला येणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांचा निरंतर संपर्क
विभागीय नेतृत्वशील कार्यकर्त्यांचे फोन अविरत येत असून आजतायत झालेल्या संवादानुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून १५० ,पुणे – १३० ,सातारा – १२५ , कोकण – १२० , नागपुर – १०० , नगर – ९० बीड व बुलढाणा – १५० , लोणंद – ७५ , कोल्हापूर – ६० ,सांगली – ५०,सोलापूर – ४५ कार्यकर्त्या येणार आहेत.येत्या २ दिवसात येणाऱ्या महिला भगिनी व कार्यकर्त्यांची ही संख्या ५ पटीने निश्चित वाढणार असल्याचे इंगोले मॅडम विश्वासपूर्वक म्हणाल्या.

