1 min read

युद्धरत मधील कवितेचा स्वर आत्मभान जागवणारा,उत्कर्ष कलाविष्कार तर्फे आयोजित अभिवाचन कार्यक्रमात कवी शशिकांत हिंगोणेकर यांचे मत

Loading

युद्धरत मधील कवितेचा स्वर आत्मभान जागवणारा

-उत्कर्ष कलाविष्कार तर्फे आयोजित अभिवाचन कार्यक्रमात कवी शशिकांत हिंगोणेकर यांचे मत

भुसावळ दि.23: युध्दरत काव्यसंग्रहातील कवितेचा स्वर आत्मभान जागवणारा आहे.
युद्धाकडून बुद्धाकडे जाणाऱ्या तसेच कविता माणूसपणाचे हक्क नाकारणाऱ्या पारंपारिक व्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या आहेत. आज समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी संवेदनशिल मनाला अंतर्बाह्य अस्वस्थ करत आहेत. हा सभोवतालचा काळोख फोडून त्याला उजेडाचे रस्ते दाखवणारी व समाजातील विसंगतीवर बोट ठेवून त्यावर प्रखरपणे भाष्य करणारी कविताच काळाच्या कसोटीवर टिकेल. असे मत कवी शशिकांत हिंगोणेकर यांनी व्यक्त केले.

उत्कर्ष कलाविष्कार तर्फे आयोजित फोर्थ शनिवार उपक्रमांतर्गत आयोजित युद्धरत काव्यसंग्रहातील कविता अभिवाचनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश विसपुते होते.

युद्धरत कविता संग्रहातील कविता युद्ध, सभोवताल, कवितेचा श्वास, छलचक्र वर्तमान, हे माझ्या प्रिय देशा, पुन्हा युग बदलते आहे अशा सात भागात विभागण्यात आलेल्या आहेत.
यातील काही निवडक कवितांचे अभिवाचन उत्कर्ष कलाविष्कारच्या अनिल कोष्टी, कुंदन तावडे, जयश्री पुणतांबेकर, आनंद सपकाळे, तेजस पवार या कलावंतांनी केले.

नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषद ,पिंपरी चिंचवड पुणे या संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट वांडमय लेखन पुरस्कार तर काव्यरसिक मंडळ डोंबिवली या संस्थेतर्फे कै. अनिल साठे स्मृती सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार असे दोन मानाचे राज्यस्तरीय पुरस्कार युद्धरत कवितासंग्रहास जाहीर झाले. त्या निमित्त संस्थेतर्फे कवी शशिकांत हिंगोणेकर यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास ज्येष्ठ कवी काशिनाथ भारंबे (निर्मोही) सुरेश कुसुंबीवाल,पुष्कराज शेळके, वसंतदादा जंजाळे, किशोर सपकाळे, महेंद्र तायडे प्रभाताई तायडे, रमाकांत पाटील आणि कलारसिक उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंद सपकाळे यांनी केले तर आभार अनिल कोष्टी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *