महिला ही चंदनागत झिजणारी जगाला मिळालेले वरदान
मुकुंद सपकाळे
![]()

महिला ही चंदनागत झिजणारी जगाला मिळालेले वरदान
मुकुंद सपकाळे
आदिवासी वाल्मीकलव्य सेनेतर्फे कृतज्ञता महिला सन्मान सोहळा
जळगाव : स्त्री ही राज्यकारभाराची धुरा सांभाळणारी, धैर्यशील, कर्तृत्ववान नेतृत्व व सहनशीलतेने प्रत्येक कार्याला खर्या धर्माची जोड देणारी, चंदनागत झिजणारी, महानतेने सर्वार्थाने जगताला मिळालेले वरदान आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले.
आदिवासी वाल्मीकलव्य महासंघ संचलित आदिवासी वाल्मीकलव्य सेनेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कृतज्ञता महिला सन्मान सोहळा शिव कॉलनी परिसरात सायंकाळी झाला, त्यावेळी ते बोलत होते. यानिमित्त विविध कार्यक्रम, स्पर्धाही घेण्यात आल्या. डॉ. सुरेश राणे अध्यक्षस्थानी होते. विचारमंचावर विशेष अतिथी म्हणून एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे, सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागूल, माजी जिल्हाधिकारी भागवत सैंदाणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा स्काउट-गाइड संघटक बी. व्ही. पवार, निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी सी. पी. निकम, राजेंद्र रायसिंग, प्रभाग समितीचे प्रमुख रवींद्र (बंटी) नेरपगारे, वरिष्ठ पत्रकार सुरेश कोहली, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा ज्योती सोनार, आदिवासी वाल्मीकलव्य सेना महिला समितीच्या राज्य उपाध्यक्षा सुलोचना बाविस्कर, आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे प्रदेश सचिव गुलाबराव बाविस्कर, जिल्हाध्यक्ष योगेश बाविस्कर यांची उपस्थिती होती.
सोहळ्यात प्रतिकूल परिस्थिती परिवार सांभाळणार्या कर्तृत्व, सामर्थ्यवान, प्रतिभावंत, कर्तृत्वशील महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यात कुमुद पब्लिकेशन्सच्या संचालिका संगीता माळी, रत्नमाला महाले, इंदिरा जाधव, जयश्री नेमाडे, लताबाई बाविस्कर, सविता सुतार, कांताबाई झेगोकार, मीराबाई चौधरी, सुनंदा सोनगिरे, प्रतिभा पाटील, संगीता कोळी, साळुंकाबाई शिंपी आदींचा साडी-चोळी, गुलाबपुष्प देत सुलोचना बाविस्कर, पी. डी. बाविस्कर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. बागूल यांनी, स्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असून त्या आधाराविना जीवन जगण्याचा विचार एकांगी असू शकतो हा एकांगी विचार अडथळे निर्माण करणारा आणि एकूणच जगण्याला अर्थहीन करणारा असतो असे विचार त्यांनी मांडले. प्राचार्या जयश्री नेमाडे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना स्त्री शिक्षणाचे उद्धार करते महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक विचारांचे आपल्या जीवनामध्ये अनुकरण करण्याबरोबर आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांचा सन्मान करण्याला आपण शिकलो तर निश्चितपणे कुटुंबाची वाटचाल ही यशस्वीते कडे होत असते अशा प्रकारचे मनोगत यांनी व्यक्त केले. सेवानिवृत्त गुलाबराव बाविस्कर, योगेश बाविस्कर, सुलोचना बाविस्कर, गजेंद्र पाटील, राजेंद्र रायसिंग, ज्योती सोनार यांनी मनोगत व्यक्त केले. मंगल बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. खंडू महाराज यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग बाविस्कर यांनी आभार मानले. सोहळ्याला जळगावकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

