तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रप्रेमाचा जागर — स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाची दिमाखदार बाईक रॅली
![]()
तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रप्रेमाचा जागर — स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाची दिमाखदार बाईक रॅली
जळगाव प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातर्फे बाईक रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महाविद्यालयातील शिक्षक बंधू-भगिनींनी बाईक रॅलीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. हातात तिरंगा ध्वज घेत देशभक्तीपर घोषणा देत सहभागी झालेल्या शिक्षकांनी विद्यार्थी व नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचा संदेश दिला.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी आणि नागरिकाच्या मनात राष्ट्रध्वजाविषयी आदर, अभिमान आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता. रॅलीतून राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि तिरंग्याचा सन्मान यांचा प्रभावी संदेश देण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. रॅलीमुळे परिसरात उत्साहाचे आणि देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.

