अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त ए.टी. झांबरे विद्यालयात विविध उपक्रम
![]()
अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त ए.टी. झांबरे विद्यालयात विविध उपक्रम
जळगांव प्रतिनिधी
जळगाव दि. ०१/०८/२०२६ : के.सी.ई. सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याला अभिवादन केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि लोकजागृतीच्या कार्याविषयी आपले विचार प्रभावीपणे मांडले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. वैष्णवी सुनील सोनवणे, द्वितीय क्रमांक कु. धनश्री विवेक मोरे आणि तृतीय क्रमांक कु. यशस्विनी विजय मिस्तरी यांनी मिळविला. विजेत्या विद्यार्थिनींना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रकार्य, स्वराज्याची संकल्पना, राष्ट्रजागृती आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान याविषयी आपले विचार मांडले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. लोक्षंदा रुपेश महाजन, द्वितीय क्रमांक कु. रुद्राणी चारुदत्ता पाटील आणि तृतीय क्रमांक कु. लावण्या राहुल सावदेकर यांनी पटकाविला. या विद्यार्थिनींनाही बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कु. सोहाली गोपाळ चौधरी या विद्यार्थिनीने प्रभावी भाषण केले. आपल्या भाषणातून तिने लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या राष्ट्रभक्ती, स्वराज्याची प्रेरणा आणि समाजजागृतीच्या कार्याचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती प्रतिभा लोहार, श्रीमती वर्षा चौधरी, श्रीमती सुचिता बाविस्कर, श्री. निर्मल चतुर, श्रीमती रोहिणी पाटील आणि श्रीमती शीतल कोल्हे यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.
या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक – शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची ओळख आणि लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्तीपूर्ण विचारांची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी, तसेच त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, राष्ट्रप्रेम आणि वैचारिक समृद्धी निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.

