अमळनेरमध्ये पूरस्थितीत नगरपरिषदेचे युद्धपातळीवरील बचाव व मदतकार्य; प्रशासनासह लोकप्रतिनिधींची धाव
![]()
अमळनेरमध्ये पूरस्थितीत नगरपरिषदेचे युद्धपातळीवरील बचाव व मदतकार्य; प्रशासनासह लोकप्रतिनिधींची धाव
अमळनेर, प्रतिनिधी :
अमळनेर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीसह पिंपळे नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शहरातील विविध भागांमध्ये पाणी शिरले. पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अशा गंभीर परिस्थितीत अमळनेर नगरपरिषदेने प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षितजी बाविस्कर, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, सफाई कर्मचारी व नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी नागरिकांच्या सतत संपर्कात राहून त्यांना धीर देत मदतकार्य करत होते.
दरम्यान, आमदार शिरीषदादा चौधरी यांनीही स्वतः शहरातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून नगरपरिषदेच्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षांसमवेत विविध भागांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला व त्यांना धीर दिला.
नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकाने अनेक ठिकाणी धाडसी बचावकार्य केले. गुरुकृपा कॉलनी येथून अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुकलीसह तिच्या कुटुंबीयांची सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच सरदार कुटुंबातील सुमारे पाच ते सात जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यश आले.
गलवाडे रोडवरील माढा कॉलनीमध्ये एका कुटुंबाच्या घरात सुमारे चार फूट पाणी शिरले होते. अत्यंत कठीण परिस्थितीत अग्निशमन विभागाने मोठी कसरत करत त्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह एका आजारी वयोवृद्ध महिलेची सुखरूप सुटका केली.
याशिवाय पैलाड गेट–चोपडा रोड परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. रुजीनगर येथून सुमारे १२ ते १३ नागरिकांची सुटका करण्यात आली, तर गुलमोहर कॉलनी परिसरातील नागरिकांनाही सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात यश आले.
संपूर्ण बचाव मोहिमेदरम्यान अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग तसेच नगरपरिषदेच्या सर्व कर्मचारीवर्गाने अतिशय तत्परता, धाडस आणि समर्पित भावनेने काम करून नागरिकांचे जीव वाचविण्यास मोलाचे योगदान दिले.
सध्या शहरातील पूरस्थितीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षितजी बाविस्कर, मुख्याधिकारी गणेश शिंदे व नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी सातत्याने लक्ष ठेवून असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली.

