पत्रकारांच्या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक; ,रक्षा खडसे व प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीने व्हॉईस ऑफ मीडियाचे उपोषण मागे
![]()
पत्रकारांच्या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक;
रक्षा खडसे व प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीने व्हॉईस ऑफ मीडियाचे उपोषण मागे
नवी दिल्ली : देशभरातील पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या वतीने राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला अखेर यश मिळाले. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीने झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर केंद्र सरकारने पत्रकारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली.
देशभरातील पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकार सुरक्षा कायदा, पत्रकारांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य विमा, निवृत्तीवेतन, पत्रकार कल्याणकारी योजना, पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी शैक्षणिक सुविधा, डिजिटल माध्यमांतील पत्रकारांना मान्यता, तसेच पत्रकारितेचे स्वातंत्र्य आणि संरक्षण आदी विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभारण्यात आले होते. देशातील विविध राज्यांतील पत्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत केंद्र सरकारचे लक्ष या प्रश्नांकडे वेधले.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय युवक व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आंदोलनकर्त्या पत्रकारांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी निमंत्रित केले. या बैठकीत पत्रकारांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पत्रकारांचे प्रश्न हे केवळ एखाद्या राज्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशातील माध्यम क्षेत्राशी संबंधित असल्याची बाब प्रतिनिधींनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी रक्षा खडसे यांनी पत्रकारांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार गंभीर आणि सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. संबंधित मंत्रालयांशी समन्वय साधून पत्रकारांच्या प्रश्नांवर योग्य तो मार्ग काढण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अत्यंत जबाबदारीने काम करत असून त्यांच्या न्याय्य मागण्यांचा सरकार निश्चितच सकारात्मक विचार करेल, असेही त्यांनी नमूद केले.
यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही आंदोलनस्थळी पत्रकारांशी थेट संवाद साधला. पत्रकारांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार संवेदनशील असून या प्रश्नांचा प्रभावीपणे संबंधित मंत्रालयांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सरकारशी सकारात्मक संवाद कायम ठेवून आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. त्यांच्या मध्यस्थीमुळे सरकार आणि पत्रकार प्रतिनिधींमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर चर्चा करून बेमुदत उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, सरकारने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत पत्रकारांच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीस व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के, महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य कल्पेश महाले आणि महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख बापुराव ठाकरे उपस्थित होते. तसेच आंदोलनस्थळी देशातील विविध राज्यांतील पदाधिकारी, पत्रकार आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपोषण मागे घेतल्यानंतर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि प्रतापराव जाधव यांचे आभार मानले. पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांवर लवकरच ठोस आणि सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच पत्रकारांच्या हक्कांसाठी, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी आणि पत्रकारांच्या सन्मानासाठी संघटनेचा लढा भविष्यातही सातत्याने सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी आपल्या समारोपीय भाषणांमध्ये सांगितले की
आजचा हा संघर्ष केवळ एका संघटनेचा नाही, तर देशभरातील प्रत्येक पत्रकाराच्या हक्कांचा संघर्ष आहे.
जंतर-मंतरवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकारांनी आपली एकजूट आणि ताकद दाखवून दिली.
आपल्या न्याय्य मागण्यांची केंद्र सरकारने सकारात्मक दखल घेतली, ही आपल्या आंदोलनाची पहिली मोठी उपलब्धी आहे.
रक्षा खडसे आणि प्रतापराव जाधव यांनी केलेल्या मध्यस्थीबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.
सरकारने दिलेले आश्वासन हे आमच्यासाठी विश्वासाचे पाऊल आहे; मात्र आता त्याच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणे ही आपली जबाबदारी आहे.
पत्रकार सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आरोग्य, निवृत्तीवेतन आणि पत्रकारांच्या कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्न आपण सातत्याने मांडत राहू.
व्हीओएमच्या प्रत्येक पत्रकाराने एकजुटीने आणि संघटितपणे पत्रकारितेच्या सन्मानासाठी उभे राहिले पाहिजे.
आजचे उपोषण आपण मागे घेत आहोत, पण पत्रकारांच्या हक्कांचा संघर्ष थांबलेला नाही.
देशातील पत्रकारांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी व्हीओएम भविष्यातही प्रत्येक स्तरावर लढा देईल.
एक पत्रकार मजबूत झाला, तर पत्रकारिता मजबूत होईल; आणि पत्रकारिता मजबूत झाली, तर लोकशाही अधिक मजबूत होईल!
चौकट
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे उपोषण सोडवण्यासाठी आंदोलन स्थळी आले होते त्यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले. मागण्या मान्य होतील असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली.



