आई’ विद्यापीठ जपत, संवाद,संस्कार हरवू देऊ नका — सारिका पन्हाळकर-महोत्रा ,मी पणा सोडा, एकत्र या; हिंदू समाजाची शक्ती वाढली पाहिजे — विपीन कुमार , विराट हिंदू संमेलनात कुटुंबव्यवस्था, मातृत्व, सामाजिक समरसता आणि संस्कृती संवर्धनाचा संदेश
![]()
*‘आई’ विद्यापीठ जपत, संवाद,संस्कार हरवू देऊ नका — सारिका पन्हाळकर-महोत्रा*
*मी पणा सोडा, एकत्र या; हिंदू समाजाची शक्ती वाढली पाहिजे — विपीन कुमार*
*विराट हिंदू संमेलनात कुटुंबव्यवस्था, मातृत्व, सामाजिक समरसता आणि संस्कृती संवर्धनाचा संदेश*
मुंबई : आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात माणसे एकमेकांपासून दूर जात असताना घरातील संवाद, संस्कार आणि माणुसकी जपण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. यासाठी आई हा महत्वाचा धागा आहे. ‘आई’ ही केवळ व्यक्ती नसून प्रत्येक घरातील एक जिवंत विद्यापीठ आहे. तिच्या संस्कारांतूनच संस्कृती टिकते, समाज घडतो आणि राष्ट्राला दिशा मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, विचारवंत आणि जागतिक संशोधक आई चळवळीच्या जनक सारिका पन्हाळकर-महोत्रा यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तुळसीनगर येथे आयोजित विराट हिंदू संमेलन आणि शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी हिंदू संस्कृती, सामाजिक समरसता, कुटुंबव्यवस्था आणि पुढील पिढीच्या संस्कारक्षम जडणघडणीवर विशेष भर देण्यात आला.
सारिका पन्हाळकर-महोत्रा यांनी आपल्या प्रभावी भाषणातून कुटुंबसंस्था, मातृत्व आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाच्या भवितव्यासाठी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगताना त्यांनी, “महिलांकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारीही महिलांवर आहे,” असे प्रतिपादन केले. सामाजिक समरसता हे भारतीय संस्कृतीचे मूलभूत अंग असल्याचे सांगत त्यांनी लहानपणापासूनच मुलांमध्ये समरसतेची भावना रुजविण्याची गरज व्यक्त केली. “मोठ्यांचा आदर करणे हीच आपली संस्कृती आहे. सामाजिक रूढी आणि परंपरा यांचे जतन करण्याची शिकवण हिंदू समाजाने जगाला दिली आहे,” असे त्या म्हणाल्या.आईच्या भूमिकेवर भाष्य करताना त्यांनी, “आई नावाचे विद्यापीठ प्रत्येकाच्या घरात असते. आईची शिकवण हे जगातील सर्वात मोठे ज्ञान आहे. आई कधी घड्याळ पाहत नाही, कारण तिच्या प्रेमाचे मूल्यांकन कधीच होऊ शकत नाही,” असे भावनिक उद्गार काढले. आजच्या धावपळीच्या जीवनात घरातील संवाद हरवत चालल्याची खंत व्यक्त करत त्यांनी, “भेटवस्तू देण्यापेक्षा आपल्या माणसांना वेळ द्या, संवाद साधा. हीच आपली खरी संस्कृती आहे,” असे आवाहन केले.
यावेळी कोकण प्रांत प्रचारक विपीन कुमार यांनी हिंदू समाज संघटन आणि सामाजिक ऐक्य यावर मार्गदर्शन केले. “आज समाजात ‘मीपणा’ वाढत असून त्यामुळे वाद आणि भांडणे वाढत आहेत. आपण सर्व ईश्वराचे पाईक आहोत, ही भावना जोपासणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले. मंत्री नितेश राणे यांची यावेळी खास उपस्थिती होती.
विपीन कुमार म्हणाले, पुढील पिढी सुरक्षित आणि संस्कारित घडविण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे नमूद करत त्यांनी “माझे तेच खरे” ही भूमिका सोडून समाजहिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. हिंदू समाज माणुसकीचा समन्वय घडवून आणतो, असे सांगताना त्यांनी भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचाही उल्लेख केला.
कार्यक्रमात इतिहास संकलन समितीचे कोकण प्रांत प्रमुख मल्हार गोखले आणि कोकण प्रांत प्रचारक विनय सामंत यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, संघगीत तसेच किल्ले आणि शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन हे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाचे संयोजन विनायक वायंगणकर यांनी केले तर सुचित सावंत यांनी कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित या संमेलनातून हिंदू संस्कृती, सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रीय मूल्यांचा संदेश देण्यात आला.
___________________________________
फोटो कँप्शन


: तुळसीनगर येथे आयोजित विराट हिंदू संमेलन आणि शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात बोलतांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, विचारवंत, जागतिक संशोधक आई चळवळीच्या जनक सारिका पन्हाळकर-महोत्रा.
____________________________

