मयत सभासदांच्या वारसांना मतदान हक्कासाठी हरकतींचा जोर; शेतकरी संघ निवडणुकीत नवा वाद ,अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या यादीवर प्रश्नचिन्ह; अंतिम दिवशी उपनिबंधकांकडे निवेदन
![]()
मयत सभासदांच्या वारसांना मतदान हक्कासाठी हरकतींचा जोर; शेतकरी संघ निवडणुकीत नवा वाद
अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या यादीवर प्रश्नचिन्ह; अंतिम दिवशी उपनिबंधकांकडे निवेदन
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वीच मतदार यादीवरून वाद निर्माण झाला असून, मयत सभासदांच्या वारसांना मतदानाचा हक्क मिळावा या मागणीसाठी आज हरकतींचा जोर वाढला.
दि. २० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्राथमिक मतदार यादीत मयत सभासदांच्या वारसांचा समावेश नसल्याने अनेक सभासदांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर, हरकत नोंदविण्याचा आज (दि.३० मार्च २०२६) शेवटचा दिवस असल्याने संबंधितांनी तत्काळ पावले उचलत जिल्हा उपनिबंधक तथा तालुका सहकारी निवडणूक अधिकारी, जळगाव यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, सहकारी तत्त्वांनुसार मयत सभासदांच्या वारसांना प्रतिनिधित्वाचा हक्क मिळणे आवश्यक आहे. अन्यथा अनेक कुटुंबांना मतदान प्रक्रियेपासून वंचित राहावे लागेल, जे अन्यायकारक ठरेल.
यावेळी हरकतीचे निवेदन सादर करताना माजी अध्यक्ष संजय पुनाजी पाटील, माजी अध्यक्ष अनिल शिसोदे, रणजीत भीमसिंग पाटील तसेच झाडी येथील दीपककुमार वसंतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या घडामोडींमुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले असून, प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वारसांना न्याय मिळणार का? हा प्रश्न आता शेतकरी वर्गात चर्चेचा विषय ठरत आहे.

