“समुद्र आहे तर जीवन आहे” — डहाणू येथे विद्यार्थ्यांचे निसर्गाशी सखोल नाते , कांदळ वन, सागरी जीवसृष्टी आणि प्रदूषणमुक्तीवर एकदिवसीय निसर्ग शिबिर
![]()
“समुद्र आहे तर जीवन आहे” — डहाणू येथे विद्यार्थ्यांचे निसर्गाशी सखोल नाते
कांदळ वन, सागरी जीवसृष्टी आणि प्रदूषणमुक्तीवर एकदिवसीय निसर्ग शिबिर
मुंबई प्रतिनिधी
समुद्र हा पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याचा अथांग, विशाल आणि निसर्गाचा अनमोल खजिना आहे. विशालता, सौंदर्य आणि जीवनदायी शक्तीचे प्रतीक असलेला समुद्र सागरी जीवनाचे आधारस्थान आहे. “मी आहे तरच पृथ्वीवर जीवन आहे” हे समुद्राचे जणू मौन वाक्यच आहे. त्यामुळे समुद्र संवर्धन आणि स्वच्छता ही काळाची गरज बनली आहे. हीच जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी डहाणू येथे प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
राष्ट्रीय हरित सेना योजना, इको क्लब शाळा, सामाजिक वनीकरण विभाग, इंट्रॅक्ट क्लब आणि के. एल. पोंदा हायस्कूल, डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय निसर्ग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांना कांदळ वनातील जलीय वन्यजीव, सागरी परिसंस्था, प्राण्यांचे महत्त्व व प्रदूषण दूर करण्याचे उपाय यांची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली शिबिरादरम्यान वन अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. मा. मुख्याध्यापक श्री. सोपानजी इंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री. चंद्रकांत खुताडे सर व सौ. अनुपमा जाधव मॅडम यांनी शिबिर यशस्वीपणे पार पाडले.
विद्यार्थ्यांना समुद्र हा केवळ पाण्याचा साठा नसून पृथ्वीचे भूषण आणि जीवनाचा आधार आहे, याची जाणीव करून देण्यात आली. सागर संपत्तीचे महत्त्व, जैवविविधतेचे संरक्षण आणि समुद्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी यावर मार्गदर्शन करण्यात आले. निसर्ग ही आपली देणगी आहे आणि ती पुढील पिढ्यांसाठी टिकवणे हे आपले कर्तव्य आहे, हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात आला.
या प्रसंगी मा. किशोर वाढू सर, भूषण भोईर सर व अन्य वनरक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना नाश्ता, जेवण, वही, पेन व कॅप देण्यात आली. तसेच समुद्र भ्रमंतीविषयी उपयुक्त माहितीही देण्यात आली.
मा. सौ. रसिका घागस मॅडम, मा. श्री. सुनिल मोरे सर, मा. सौ. मनिषा पटेल मॅडम तसेच शिक्षक बंधू-भगिनींनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जाणीव निर्माण करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
समुद्र संवर्धन आणि निसर्ग रक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला.

