पीएम श्री केंद्रीय विद्यालय, उमवी जळगाव येथे ‘परीक्षा पे चर्चा’ अंतर्गत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न
![]()
पीएम श्री केंद्रीय विद्यालय, उमवी जळगाव येथे ‘परीक्षा पे चर्चा’ अंतर्गत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगांव प्रतिनिधी :
जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील पीएम श्री केंद्रीय विद्यालय, उमवी जळगाव येथे केंद्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या “परीक्षा पे चर्चा” या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती अर्थात पराक्रम दिन याचे औचित्य साधत तसेच “ऑपरेशन सिंदूर” या थीमवर आधारित ही प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील सीबीएससी पॅटर्नच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकूण १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेत ज्ञान, चालू घडामोडी आणि राष्ट्रीय विषयांवरील आपले प्रभुत्व सिद्ध केले.
स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थी व त्यांच्यासोबत आलेल्या शिक्षकांचा केंद्रीय विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. सहभागींसाठी चहा-नाश्ता, भोजन तसेच सहभाग प्रमाणपत्रांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य श्री सोना कुमार उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी “परीक्षा पे चर्चा”, पराक्रम दिन आणि ऑपरेशन सिंदूर या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत देशभक्ती, धैर्य आणि स्पर्धा परीक्षांतील आत्मविश्वासाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे संयोजन श्री नितीन आरसे यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी श्री गणेश वाघमारे व श्रीमती प्रीती सोज्वळ यांनी प्रभावीपणे सांभाळली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच राष्ट्राभिमान व स्पर्धात्मक वृत्ती वाढवणारा ठरला.

