पुणे-नाशिक महामार्गावर रात्रभर भीषण ट्रॅफिक जाम – हजारो प्रवासी अडकले; प्रशासन मात्र ढिम्म!
![]()
पुणे-नाशिक महामार्गावर रात्रभर भीषण ट्रॅफिक जाम – हजारो प्रवासी अडकले; प्रशासन मात्र ढिम्म!
अमळनेर प्रतिनिधी – पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळीपर्यंत तब्बल अकरा तास वाहतूक ठप्प राहिली. रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत हजारो वाहने जागच्या जागी अडकली होती. यातून खान्देशातील शेकडो प्रवासी, भाविक भक्त, रुग्ण आणि लहान बालके यांना प्रचंड हाल सोसावे लागले. प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने प्रवाशांचा संताप उसळला आहे.
संततधार पावसामुळे गाड्यांमधून बाहेरही पडता येत नव्हते. पिण्याचे पाणी, खाण्याची सोय नाही, तर वातानुकूलित बसमधील प्रवाशांचा जीव अक्षरशः गुदमरू लागला. महामार्गाच्या बाजूला शौचालय वा प्रसाधनगृह नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली.
दरम्यान, आपत्कालीन फोन क्रमांक 112 वर वारंवार फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. राज्यातील भाविक भक्तांना भाषेच्या अडचणीमुळे संपर्क साधताना अधिक त्रास सहन करावा लागला.
या भीषण कोंडीत काही प्रवासी आपला राग उगाचच चालकांवर काढत होते, तर बेशिस्त कारचालक व आपल्या श्रीमंतीचे बिभत्स प्रदर्शन करणाऱ्या प्रवाशांनी गरीब-श्रीमंतातील दरी अधिक ठळक केली.
नैसर्गिक संपत्तीच्या सततच्या हानीमुळे व विकासाच्या नावाखाली झालेल्या अतिरेकी कामांमुळे असे संकट निर्माण होत असल्याचा आरोप अनेकांनी केला.
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीपजी घोरपडे हे या महामार्गावर एस.टी. महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करत होते. त्यांनी मराठी लाईव्हशी बोलताना सांगितले की, “ही परिस्थिती डोळ्यादेखत होती, परंतु प्रशासनाकडून काहीच उपाययोजना दिसून आली नाही. प्रवाशांचा प्रचंड त्रास होत होता. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.”
प्रशासनाकडून याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. नेमके कारण गुलदस्त्यात असले तरी, रात्रीचा अकरा तासांचा हा कोंडीतून प्रवासी त्रस्त झालेले पाहायला मिळाले.

