कल्याणमध्ये जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेचा थरार!
![]()
कल्याणमध्ये जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेचा थरार!
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी): जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय गट (१४, १७, १९ वर्षांखालील) मुलामुलींची तलवारबाजी स्पर्धा १४ सप्टेंबर २०२५ रोजी श्री वाणी विद्याशाला हायस्कूल, कल्याण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक तरुण खेळाडूंनी सहभाग घेऊन आपल्या तलवारबाजीचे कौशल्य दाखवले.
स्पर्धेच्या उद्घाटन मान्यवर उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्रीडा पर्यवेक्षक, प्रवीण कांबळे, तसेच फिजिकल डायरेक्टर, के.एम. अग्रवाल कॉलेज चे फिजिकल डायरेक्टर डॉ.विजय सिंग,बी.के. बिर्ला कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. चिंतामण पाटील एस. आय. ए.महाविद्याचे क्रीडा संचालक प्रा.गणेश मोरे, वाणी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अतिश ठाणगे,महेश पवार अक्षय सर, महादेव क्षीरसागर, अरुण पाटील (सेंट थॉमस हायस्कूल) आणि सोलापूरचे माजी क्रीडा अधिकारी तथा छत्रपती पुरस्कार विजेते डॉ.भूषण जाधव यांच्या उपस्थितीने स्पर्धेची शोभा वाढवली.
या स्पर्धेचे पंचप्रमुख म्हणून मंदार कुलकर्णी यांनी उत्तम काम पाहिले. त्यांना कुमार लोकेश वाघ, महेश वाघ आणि कु. सोहम गेडाम यांनी सह पंच म्हणून सहकार्य केले.
खेळाडूंच्या सोयीसाठी अल्पोपाहार म्हणून बिस्किटांचे वाटप करण्यात आले. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आरोग्य व्यवस्था देखील सज्ज ठेवण्यात आली होती, ज्यामुळे खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेतली गेली. बी.के. बिर्ला कॉलेजने स्पर्धेसाठी इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
श्री वाणी विद्याशाला हायस्कूल, कल्याण येथील मुख्याध्यापिका सौ.अंजना रेड्डी आणि दि. साउथ इंडियन असोसिएशन, कल्याणचे अध्यक्ष व सर्व संस्था पदाधिकारी यांनी स्पर्धेसाठी शाळेची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर खेळ प्रमुख आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा सदस्य गजानन वाघ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. ही स्पर्धा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तलवारबाजीसारख्या खेळाला नवी ऊर्जा देण्यासाठी यशस्वी ठरली.


