स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे
![]()
स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे
शिंदवणे: आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी अनेक देशभक्तांनी यज्ञ, दान ,त्याग ,तप केले आणि परिणामी बलिदानाचे महान कर्म करून आपला देह स्वातंत्र्यासाठी अर्पण केला. म्हणून अशा महान भारत मातेच्या सुपुत्रांचे स्मरण होण्यासाठी स्वातंत्र्य दिनाचे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. शूरवीरांनि केलेला त्याग व्यर्थ जाणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी, व राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवावी, स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण करावे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सल्लागार सदस्य,ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. श्री संत यादव बाबा हायस्कूल येथे 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यापुढे मार्गदर्शन करताना ते म्हणाले की भारताचे पंतप्रधान पूज्य. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूर राबवून आपल्या शूरवीरांनी जो अद्वितीय पराक्रम केला, त्यामुळे भारत देशाच्या लढवय्या रणनीतीची कल्पना जगाला आली. व जगामध्ये भारताचा एक दबदबा निर्माण झाला. हे अविस्मरणीय काम केल्यामुळे सर्व भारतवासीयांना ऑपरेशन सिंदूर चा खूप अभिमान वाटतो. स्वातंत्र्य दिनाच्या या समारंभाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खादी ग्रामोद्योग प्रकल्प संचालक प्रकाशजी जगताप उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्रीमती उषाताई महाडिक, संस्थेचे उपाध्यक्ष रामदास जयवंत महाडिक, शिंदवणे गावचे पोलीस पाटील पोपटरावजी महाडिक पाटील, वळती गावचे शाळा समिती माजीअध्यक्ष श्री बाळासाहेब कुंजीर, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कांचन, कोंडीबा अण्णा कामठे संचालक, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर जगताप,शाळेच्या संचालिका सौ विद्याताइ यादव, सारिका ताई महाडिक, निर्मलाताई महाडिक, शरद महाडिक अध्यक्ष संभाजी राजे कुस्ती संकुल प्रामुख्याने उपस्थित होते. संस्थेचे मुख्याध्यापक सुरेश कांचन सर यांनी प्रास्ताविकामध्ये शाळेबद्दल माहिती सांगून दुर्गम भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही शाळा स्वर्गीय जनार्दन बापू महाडिक यांच्या सहकार्याने स्थापन झाल्याचे आवर्जून सांगितले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या कवायती सादर केल्या. तसेच विद्यार्थ्यांनी ध्वजास मानवंदना दिली. देशभक्तीपर गीतांचे यावेळेस आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कोपनार सर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री लांडे सर यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, गावकरी वर्ग पालक वर्ग, अनेक राष्ट्रभक्त प्रामुख्याने उपस्थित होते.

