हरवलेल्या हितेशचा सुखरूप शोध — मैत्री, तत्परता आणि पोलिसी चातुर्याचा सुंदर संगम”
![]()
“हरवलेल्या हितेशचा सुखरूप शोध — मैत्री, तत्परता आणि पोलिसी चातुर्याचा सुंदर संगम”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आज दिनांक १३ ऑगस्ट २०२५ हा दिवस एका कुटुंबासाठी सुटकेचा श्वास घेऊन आला.
मुंदडानगर-२, अमळनेर येथील बालक हितेश रवींद्र पाटील काल सायंकाळी ट्युशनला जातो असे सांगून घरातून निघाला, परंतु रात्री उशिरापर्यंत परतला नाही. अचानक हरवलेल्या या मुलाच्या शोधासाठी परिसरात चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले.
सकाळी सुमारास हर्षल पाटील सर (अंतुर्ली) यांनी ही बाब कळवली. तपासादरम्यान कळाले की हितेशला जवखेडा येथे पाहण्यात आले, मात्र तो सोनगीरच्या दिशेने एसटी बसने निघून गेला होता. त्यानंतर तो नंदुरबारच्या दिशेने निघाल्याची माहिती मिळताच शोधमोहीम अधिक गतीमान झाली.
या मोहिमेत संजय मनोरे (करणखेडा, ता. अमळनेर) — जे नंदुरबार येथे पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहेत — यांनी हातातली सर्व कामे सोडून, आपल्या पोलिसी अनुभवाचा वापर करत, गोपनीय सूत्रांना माहिती दिली. चिमठाणा, दोंडाईचा, रनाळे परिसरात सापळा लावला गेला, तर स्वतः त्यांनी नंदुरबार शहरात धुळे चौफुली आणि एसटी आगार परिसरात पाळत ठेवली.
दुपारी १२.१५ वाजता धुळे–नंदुरबार बसने आलेल्या एका मुलाकडे लक्ष गेले. विचारपूस केल्यावर सुरुवातीला तो नाखूष होता, पण जवळीक आणि विश्वास दाखवल्यानंतर त्याने स्वतःची ओळख हितेश अशी सांगितली. त्याला सुरक्षितपणे हिरकणी कक्षात विश्रांतीसाठी ठेवण्यात आले.
ही आनंदवार्ता तत्काळ राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष
हर्षल पाटील सर आणि हितेशचे वडील यांना कळवण्यात आली. काही वेळातच कुटुंबीय नंदुरबार येथे पोहोचले आणि हितेशला सुखरूप आपल्या ताब्यात घेतले.
या मोहिमेत सामील सर्वांचे हे एकच मत होते —
“हितेश सुखरूप मिळणे हे आई-वडिलांच्या पुण्याईचे फळ आणि समाजातील एकतेचे प्रतीक आहे.”
—

