सीएसआरचा प्रभाव ग्रामीण विकासासाठी निर्णायक – डॉ. अनिता मोहिते यांचे स्पष्ट मत सीएसआरद्वारे परिवर्तनाचा मंत्र: ‘उदयकाळ-उदयगिरी’तर्फे प्रेरणादायी परिषद
![]()
सीएसआरचा प्रभाव ग्रामीण विकासासाठी निर्णायक – डॉ. अनिता मोहिते यांचे स्पष्ट मत
सीएसआरद्वारे परिवर्तनाचा मंत्र: ‘उदयकाळ-उदयगिरी’तर्फे प्रेरणादायी परिषद
पुणे प्रतिनिधी
“समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक स्वयंसेवी संस्था धडपड करीत असतात. त्यांच्या या कार्याला व्यापक करण्यासह परिवर्तनशील विकास साकारण्यासाठी निधीची गरज असते. ही गरज भागविण्याचे काम उद्योगांची सामाजिक बांधिलकी (सीएसआर) करते. ‘सीएसआर’चा चांगला विनियोग करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि कंपन्या यांच्यातील समन्वय महत्वपूर्ण ठरतो,” असे प्रतिपादन भारती अभिमत विद्यापीठातील सोशल सायन्स सेंटरच्या प्रभारी संचालिका डॉ. अनिता मोहिते यांनी केले.
उदयकाळ फाऊंडेशन आणि उदयगिरी सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सीएसआर कॉन्फरन्स २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात व्हर्टिव कंपनीचे वरिष्ठ संचालक डॉ. प्रशांत शिनगारे, अपिकोअर फार्मास्युटिकल्सचे उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार पाटील, उदयगिरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आर पी माने, संयोजक व उदयकाळ फाउंडेशनचे सचिव मयूर बागूल, आरती बागूल उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे, उदयगिरी सोशल फाऊंडेशन चे उपाध्यक्ष श्री शिवशंकर मोरे,सहसचिव डॉ.नंदकुमार पाटील,हे मुंबई वरून खास या काॅन्फ्ररन्स साठी आले.कोषाध्यक्ष श्री शिवराज सुर्यवंशी व पुणे मुअ संघाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिंदे तथा आय टी अभियंता श्री आकाश आदी उपस्थित होते.
सामाजिक विकास क्षेत्राची संकल्पना यावर समता शक्ती फाउंडेशनच्या संचालिका अर्चना गोमजे, प्रकल्प प्रस्ताव लेखन व निधीचे स्रोत यावर सिलॅबलच्या संस्थापिका डॉ. समीक्षा नेरुरकर, सीएसआर: कंपनीचा दृष्टीकोन यावर कल्याणी टेक्नोफोर्जचे राहुल सावंत, स्वयंसेवी संस्थांकडून कंपनीच्या अपेक्षा यावर अमडॉक्सच्या सीएसआर मॅनेजर दीप्ती घोणे कांबळे, स्वयंसेवी संस्था आणि सोशल मीडियावर विकास तिवस्कर यांनी विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले.
डॉ. अनिता मोहिते म्हणाल्या, “स्वयंसेवी संस्थांनी ग्रामीण भागात पोहोचायला हवे. तिथे अनेक कामे करण्याची गरज असून, त्यामध्ये ‘सीएसआर’चे महत्व खूप आहे. विकास प्रकल्पांचे चांगले प्रस्ताव, अहवाल बनवायला पाहिजेत. कंपन्यांपर्यंत आपले काम पोहचले, तर निधी उपलब्ध होऊ शकतो. ‘एमएसडब्ल्यू’ झालेली व्यक्ती सोबत असल्यास हे काम अधिक प्रभावीपणे होऊ शकते.”
डॉ. प्रशांत शिनगारे म्हणाले, “चांगल्या कामांसाठी कंपन्या नेहमीच निधी उपलब्ध करून देतात. समाजोपयोगी उपक्रमांना त्यांनी पाठिंबा दिल्यास शाश्वत बदल घडवता येतो. युवकांनीही पुढाकार घेत सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करावा. हे उपक्रम केवळ समस्या सोडवत नाहीत, तर समाजात आशावाद आणि प्रेरणा निर्माण करतात.”
डॉ. नंदकुमार पाटील म्हणाले, “कंपन्यांनी केवळ व्यवसायिक लाभ न पाहता सामाजिक जबाबदारीही पार पाडली पाहिजे. आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रांत गुंतवणूक केल्यास समाजाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. स्थानिक उपक्रमांना पाठिंबा देणे ही काळाची गरज असून अशा प्रयत्नांतून कंपन्यांची सकारात्मक प्रतिमा निर्माण होते.”
राम माने यांनीही मनोगत व्यक्त केले. मयूर बागुल यांनी स्वागत-प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. केतकी पवार, वर्षा डांगे यांनी सूत्रसंचालन केले. कार्तिक चव्हाण यांनी आभार मानले. वर्षा डांगे, कार्तिक चव्हाण, राहुल माने यांनी परिषद यशस्वी साठी प्रयत्न केले.

