IISER मध्ये न्याय न मिळाल्याने विद्यार्थी कोर्टात; शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह , संस्थेच्या रॅगिंग समितीवर UGC नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप; अँड कौस्तुभ पाटील यांच्याकडून याचिका दाखल
![]()
IISER मध्ये न्याय न मिळाल्याने विद्यार्थी कोर्टात; शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
संस्थेच्या रॅगिंग समितीवर UGC नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप; अँड कौस्तुभ पाटील यांच्याकडून याचिका दाखल
पुणे प्रतिनिधी
पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन आणि रिसर्च या संस्थेत रॅगिंग विरोधी नियमांचा आधार घेऊन विद्यार्थ्याच्या विरोधात पूर्वीचा राग मनात धरून कारवाई केल्याचा प्रकार घडला आहे. या बाबत संबंधित विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयात संस्थेविरोधात धाव घेतली आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये आंतर IISER स्पोर्ट्स इव्हेंट आयोजित केले गेले होते. उमाशंकर राजपूत आणि पूजित वाशिष्ठ यांच्याकडे सहभागी झालेल्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठीच्या मेस समिती चे काम होते. स्पोर्ट्स इव्हेंट सुरु झाल्यानंतर उमाशंकर राजपूत आणि पूजित वाशिष्ठ यांच्या मध्ये काम करण्यावरून शाब्दिक चकमक झाली. ते प्रकरण तिथेच मिटले. परंतु संस्थेतील प्राध्यापक नागराज बालसुब्रमण्यम हे ३ फेब्रुवारी २०२५ मध्ये डीन स्टुडंट्स अफेअर झाल्यानंतर त्यांनी उमाशंकर राजपूत याच्यावरील पूर्वीचा राग मनात धरून पूजित यास उमाशंकर राजपूत विरोधात तक्रार करायला लावली. नागराज बालसुब्रमण्यम याच्या हलगर्जीपणामुळे संस्थेतील एका विद्यार्थ्यांचे प्राण गेले होते. याबद्दल उमाशंकर राजपूत याने आवाज उठविला होता. याचा नागराज याच्या मनात राग होता.
पूजित याने ५ फेब्रुवारी २०२५ ला तक्रार केली. उमाशंकर यास ७ मार्च २०२५ ला रॅगिंग विरोधी समितीने भेटण्यास बोलावले. त्या नंतर २२ मार्च ला बोलावले परंतु दोन्ही मीटिंग मध्ये उमाशंकर याचे म्हणणे ऐकून घेतले नाही. २५ एप्रिल ला रॅगिंग विरोधी समितीने आपला अहवाल दिला व त्या आधारे ५ मे २०२५ रोजी उमाशंकर याची PhD डिग्री पुढील ६ महिन्यासाठी थांबविण्यात आली.
उमाशंकर याने संस्थेचे डायरेक्टर सुनील भागवत यांची भेट घेतली व घडलेला सर्व प्रकार सांगितलाम व कारवाई मागे घेण्याची विनंती केली व डिग्री पदवीदान समारंभात देण्याची मागणी केली. भागवतांनी उमाशंकर यास सांगितले की माफी मागितली तर पदवीदान समारंभात पदवी देऊ. त्याप्रमाणे उमाशंकर याने माफी मागितली परंतु भागवत यांनी आपला शब्द पाळला नाही. उमाशंकर यास पदवीदान समारंभात पदवी दिली नाही.
या सर्व एकतर्फी आणि अन्यायकारक कारवाईच्या विरोधात उमाशंकर याने अँड. कौस्तुभ पाटील यांच्या मार्फत उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. “उमाशंकर याच्या विरोधातील कारवाई एकतर्फी, अन्यायकारक व नैसर्गिक न्यायच्या तत्वाच्या विरोधात आहे. नागराज यांनी सूड भावनेतून कारवाई केली आहे.” असे अँड. कौस्तुभ पाटील यांनी म्हटले. घटना घडल्याची तारीख आणि तक्रारीची तारीख यामध्ये जवळपास दीड महिन्याचे अंतर आहे. तसेच तक्रार केल्यानंतर १७ दिवसांनी उमाशंकर यास बोलवण्यात आले. वास्तविक
नियमानुसार तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्काळ चौकशी करणे अनिवार्य आहे. तसेच समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर १० दिवसांनी उमाशंकर याची पदवी थांबविल्याची शिक्षा दिली. उमाशंकर व पूजित यांच्यामधील शाब्दिक चकमक मेसमध्ये झाली असताना व CCTV फुटेज उपलब्ध असताना उमाशंकर याने वारंवार विनंती करूनही CCTV फुटेज तपासून पहिले नाही यावरून असे दिसते की सुनील भागवत व नागराज यांनी जाणीवपूर्वक व सूडभावनेतून उमाशंकर यास लक्ष्य केले असे अॅड. कौस्तुभ पाटील यांनी म्हटले आहे. पुढे ते असेही म्हटले की, IISER ची रॅगिंग विरोधी समिती ही कायदेशीर व UGC च्या नियमानुसार नाही. या संबंधी UGC ला ही तक्रार करणार आहोत. संस्थेचे डायरेक्टर सुनील भागवत हे RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाऊ असल्याचे सर्वाना सांगत आहेत आणि माझे कुणीही काही करू शकत नाही या तोऱ्यात ते वावरत असतात असेही अँड. कौस्तुभ पाटील यांनी म्हटले. सुनील भागवत यांना उमाशंकर याने विनंती करूनही आपला शब्द पाळला नाही. पदवी न दिल्यामुळे उमाशंकर यास नोकरीच्या संधी गमवाव्या लागल्या आहेत.असे
अँड. कौस्तुभ पाटील यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.

