महाराष्ट्राचा महान वैचारिक,सांस्कृतिक वारसा जतन करावा… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रवींद्रजी भोळे
1 min read

महाराष्ट्राचा महान वैचारिक,सांस्कृतिक वारसा जतन करावा… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रवींद्रजी भोळे

Loading

महाराष्ट्राचा महान वैचारिक,सांस्कृतिक वारसा जतन करावा… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रवींद्रजी भोळे

पिंपरी चिंचवडआकुर्डी : भगवान श्रीकृष्णाचे योगाभ्यासाचे गुरु महर्षी शांडिल्य ऋषी या महाराष्ट्रातच वास्तव्यास होते. महाराष्ट्राला खूप मोठा सांस्कृतिक इतिहास आहे. विश्वाचे कल्याण करण्याची भावना जतविणारे माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, मोक्षप्राप्तीचा मंत्र देणाऱ्या आदिशक्ती संत मुक्ताई, रंजल्या गांजल्याची सेवा करण्याचा संदेश देणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज , यांच्यासह महान विभूती, संत महात्मे, क्रांतिवीर, स्वातंत्र्यसैनिक या महाराष्ट्रात होऊन गेले. अनेक ऋषी ,मुनी ,योगी, तपस्वी, महर्षी, हटयोगी, ह्यांच्या पावन पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या, वास्तव्यामुळे महाराष्ट्र सदैव स्फूर्तीचा जिवंत झरा व पुण्यवान झालेला आहे. हा महान वैचारिक सांस्कृतिक धार्मिक ठेवा जतन करणे काळाची गरज आहे. समता भ्रातृ मंडळ विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबवून हि उणीव भरून काढत आहे.महाराष्ट्राचा महान सांस्कृतिक वैचारिक वारसा जतन करावा, असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. समता भ्रातृमंडळ या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन व वर्धापन दिन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करताना ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे म्हणाले की संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेक कार्यकर्त्यांना आपला देह ठेवावा लागला. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून ते म्हणाले की कामगारांना त्यांचा हक्क मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला. व त्यावेळी अनेक क्रांतिकारी कार्यकर्ते हे मृत्युमुखी पडलेत. अशा या समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. कामगारांनी हक्क मागताना, कर्तव्याची जाणीव ठेवावी तसेच समता भ्रातृ मंडळाचे समाजप्रबोधन व विविध विवाह मेळाव्याचे कार्यक्रम उपयुक्त आहेत,असेही ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर, डॉ. राम खर्चे माजी अध्यक्ष भ्रातृ मंडळ पुणे, गोदावरी फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिकेत पाटील सुप्रसिद्ध निरो सर्जन जळगाव, डॉ. अक्षदा अनिकेत पाटील, डॉ.रवींद्र चौधरी, नामदेव दादा ढाके नगरसेवक पिं. ची . मनपा,समता भातृ मंडळाचे अध्यक्ष हेमंत झोपे, समताभ्रातृ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बी .टी.चौधरी, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात नीना भाऊ खर्चे पिंपरी चिंचवड लेवा पाटीदार संघ, अमोल पाटील अध्यक्ष श्री संत मुक्ताई संस्थान, बहिणाबाई महिला अल्पबचत गट अध्यक्ष विजयाताई जंगले, संस्थान,लेवाशक्तीच्या अध्यक्ष रेखा भोळे, डॉ. एल झेड पाटील, भागवत झोपे अध्यक्ष लेवा पाटीदार मंडळ सांगवी, डॉ.अशोक चौधरी लेवा पाटीदार मंडळ भ्रातृमंडळ वाकड, डॉ. निलेश सुपे भातृ मंडळ तळेगाव हे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी अनेक मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. अनिकेत पाटील म्हणाले की आजच्या युगामध्ये शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे भांडवल आहे. सर्वांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावे, व चांगले शिक्षण घ्यावे असे मत व्यक्त केले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे अध्यक्ष हेमंत झोपे, डॉक्टर निनाद वायकोळे, सिताराम राणे यांना येथील पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचा सरदार वल्लभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे डॉ, अनिकेत उल्हास पाटील व डॉक्टर अक्षदा अनिकेत पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात पिंपरी चिंचवडचे नगरसेवक नामदेव दादा ढाके यांच्या वाढदिवसानिमित्त मंडळाचे सचिव रवींद्र बराटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे क्रिकेट खेळामध्ये बक्षिसे मिळवणारी मुले, नर्मदा पायी परिक्रमा करणारे सेवक,सेविका यांनाही सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूनम चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव रवींद्र बराटे, सुरेश फेगडे यांनी केले. हा कार्यक्रम आकुर्डी येथील खंडोबा माळ देवस्थान येथे मुख्य हॉलमध्ये झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *