धरणगाव आयटीआय संस्थेत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त व्याख्यान व विशेष कार्यक्रम उत्साहात
![]()
धरणगाव आयटीआय संस्थेत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त व्याख्यान व विशेष कार्यक्रम उत्साहात
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगाव : येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आजच्या दिनी युगपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान व विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, स्वछता मोहीम, निबंध, रनिंग, रांगोळी व चित्रकला स्पर्धा यांसह पर्यावरण संवर्धन, व्यक्तिमत्व विकास, प्रमाणपत्र वाटप, उद्योजकता व स्वयंरोजगार प्रेरणा आदींसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष धरणगावचे पोलिस निरीक्षक पवन देसले, प्रमुख अतिथी आयएमसी सदस्य महेश आहेरराव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील, माहिती अधिकार कायदा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, पत्रकार भगीरथ माळी, उद्योजक एकनाथ पाटील, उद्योजक पंकज बाविस्कर व संस्थेचे प्राचार्य नवनीत चव्हाण, प्र.प्राचार्य एम ए मराठे आदी मान्यवरांच्या हस्ते राजमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्र.प्राचार्य एम ए मराठे यांनी यापुढे देखील कौशल्य, उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनच्या माध्यमातून अश्या प्रकारचे कार्यक्रम व्यवसाय शिक्षणाबद्दल प्रात्यक्षिक स्वरूपात एकंदरीत अभ्यासक्रम व भविष्यातील रोजगारांच्या संधी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्याचा संस्थेचा मानस राहील असे प्र. प्राचार्य मराठे यांनी आपल्या प्रास्ताविकात आवाहन केले. तद्नंतर व्याख्याते लक्ष्मण पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, स्वामीजी म्हणतात. उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. आजचा युवक अतिशय कर्तृत्ववान आहे. आजचा युवा-तरुण आपले सामाजिक कर्तव्ये विसरत चालला आहे. सहा इंचाचं (मोबाईल नामक) पिल्लूच्या अधीन होवून वाचन व मैदानी खेळ पूर्णपणे विसरत चालला आहे. वाचनामुळे आपण खुप काही अवगत करू शकतात. आणि वाचनाने युवा पिढीमध्ये बदल होतो. स्वामी विवेकानंदांच्या मते देश बदलण्याची शक्ती आणि सामर्थ्य केवळ आणि केवळ युवकांमध्ये आहे. कारण तुम्ही उद्याचे नागरिक आहात. युवकांना योग्य दिशा दिल्यास आपला देश नक्कीच प्रगतीपथावर जाण्यास अधिक वेळ लागणार नाही. तद्नंतर आयएमसी चे सदस्य व व्याख्याते महेश आहेरराव यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी व युवकांनी भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतर सद्गुणांचे बारकावे शिकणे गरजेचे आहे, यांसह युवकांनी केवळ धाडस शिवाय संयमी आणि सहनशील असले पाहिजे व इतरांना मदत करण्याची सवय लावली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने शिकले पाहिजे आणि भारताला पुढील स्तरावर नेले पाहिजे. त्याचप्रमाणे युवा पिढीने स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मन आणि मनगट मजबूत करावे. तसेच निकोप धर्मचिकित्सा करून सक्षम भारत घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यानंतर अध्यक्षीय मनोगतात पो.नि.पवन देसले यांनी युवा शक्तीच्या जोरावर भारताला अशक्य अशी उद्दिष्ट्ये साध्य करता येतील. जगभरातील अनेक देशांत तरुणांची संख्या कमी होत आहे. तसेच लोकसंख्याही रोडावत आहे. मात्र, भारत एकमेव देश आहे, जेथे सर्वात जास्त युवकांची संख्या आहे. इतर देशांमधून उठून दिसण्यासाठी आणि प्रगतीपथावर पुढे जात राहण्यासाठी भारतातील युवक कठोर परिश्रम करणारा आणि गुणवान असणे अत्यंत गरजेचे आहे. तरुणांना आणखी सक्षम करण्यासाठी काय करता येईल याचा उहापोह जागतिक युवा दिनी व्हायला हवा. भारतातील युवकांना योग्य दिशा दिल्यास नक्कीच भारताचा विकास वेगाने होईल असेही शेवटी पो.नि.श्री. देसले म्हणाले. संस्थेचे शिक्षक डी बी वाघ यांनी अतिशय बहारदार शैलीत सूत्रसंचालन करत विद्यार्थी वर्ग व उपस्थितांना खिळवून ठेवले. तसेच उपस्थित मान्यवरांचे आपुलकीच्या शब्दांनी आभार व्यक्त करीत कार्यक्रमाचा गोड समारोप केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी एन परदेसी, एस एन खरे, दिपक नेरकर, एन आर कापडी मॅम, एस सी भरते मॅम, ऋतू राठोड मॅम, भूषण रानवे, आर ए मोरे, एस आर चव्हाण, लोकेश चावरे यांसह कर्मचारी वृदांनी परिश्रम घेतले.

