नव्या जोमाने सगळ्या विषयांचे आत्मचिंतन करून भाजपा निर्विवादपणे महाराष्ट्रात महायुतीला यश मिळवून देईल-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांनी व्यक्त केला विश्वास
![]()

नव्या जोमाने सगळ्या विषयांचे आत्मचिंतन करून भाजपा निर्विवादपणे महाराष्ट्रात महायुतीला यश मिळवून देईल-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई-(विशेष प्रतिनिधी उदय नरे) भाजपा ही जय पराजय झाल्यानंतर त्याचे विश्लेषण करते आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागते. त्याचपद्धतीने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने काम सुरू केलेय. बैठकांचे सत्र सुरू आहे. तशाच पद्धतीने उद्या बैठक आहे. नव्या जोमाने, ताकदीने पुन्हा एकदा सगळ्या विषयाचे आत्मचिंतन करून भाजपा निर्विवादपणे महायुतीला महाराष्ट्रात यश मिळवून देईल, असा विश्वास भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी बोलताना दरेकर म्हणाले की, मी मनोज जरांगे पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सरकार या विषयात सकारात्मक आहे हे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. काही लोकं मनोज जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारला निशाणा करण्याचा प्रयत्न करताहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्यांनी मराठा समाजाला पहिले आरक्षण दिले होते ते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. सरकारची नकारात्मक भुमिका नाही. जरांगेंनी सरकारशी संवाद ठेवावा. वारंवार चर्चेतून एकेक गोष्टी, आपल्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला दिलासा द्यावा. समाजासमाजात जातीय तेढ निर्माण होईल अशाप्रकारे काही लोकांचा प्रयत्न आहे त्याला खतपाणी मिळू नये याची सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या टिप्पणीवर दरेकर म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृतुल्य, पितृतुल्य अशी आमची संघटना आहे. भाजपा हा त्या संघाचा संस्थात्मक भाग आहे. जेव्हा-जेव्हा सरसंघचालक किंवा आरएसएस मार्गदर्शन, सल्ला देत असते तो सकारात्मक घेऊन भाजपा वाटचाल करत असते. या भूमिका दुरुस्त करत पुढे जायचे ही परंपरा भाजपाची आहे. संघाच्या काही चांगल्या सूचना असतील त्या भाजपा घेत वाटचाल करत असते त्याचप्रमाणे या विषयाकडेही पाहता येईल. जेव्हा महायुतीत घटक पक्ष सामावून घेतो त्यावेळी आपण गरज सरो वैद्य मरो अशा प्रकारची भुमिका घेऊ शकत नाही. महायुतीत राष्ट्रवादीला घेतले होते. त्यांच्यासोबत युतीत लढलो, आजही ते आहेत. एका अपयशाने आपल्यासोबत घेतलेल्या सहकाऱ्यावर टोकाचे बोलणे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्याबाबतीत उचित नाही.
सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर बोलताना दरेकर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या रिक्त होणाऱ्या जागेवर कोण उमेदवार असावा हा महायुतीचा निर्णय नसतो तर त्या पक्षाचा निर्णय असतो. त्या पक्षातही केवळ अजित पवार यांचा निर्णय आपली पत्नी म्हणून नाही तर राष्ट्रवादीचे जे संसदीय मंडळ आहे त्यांनी सामुदायिकपणे पक्षाचा निर्णय घेतलेला आहे. घराणेशाही म्हणून अजित पवार यांनी केलेली गोष्ट नाही. जो काही निर्णय आहे तो त्यांच्या पक्षाने घेतलेला आहे आम्ही त्यावर भाष्य करणे योग्य ठरत नाही.
राज ठाकरेंच्या बोलण्यात तथ्य
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की, शंभर टक्के मराठी माणसांचा राग उद्धव ठाकरेंवर आहे. तो लोकसभेतील निवडणुकीत मतांमध्ये परवर्तीत झालेला दिसला. मुंबईत महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख जास्तीची मतं मिळाली आहेत. लालबाग, परळ, वरळी जो शिवसेनेचा बालेकिल्ला होता तिथे महायुतीने, भाजपने मोठ्या प्रमाणावर मतदान घेतलेले आहे. आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळीसारख्या ठिकाणी ते लीड घेऊ शकले नाहीत. मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदान झालेय. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. कोकणाने सातत्याने शिवसेनेवर प्रेम केले. परंतु कोकणातील मराठी जनता आज पूर्णपणे महायुतीच्या मागे उभी आहे. यावरून राज ठाकरेंच्या बोलण्यात तथ्य आहे.

