विज्ञान आणि विज्ञानवादी दृष्टिकोन मानवाला डोळस बनवतो.- पद्मश्री डॉ.शरद काळे.
![]()
विज्ञान आणि विज्ञानवादी दृष्टिकोन मानवाला डोळस बनवतो.- पद्मश्री डॉ.शरद काळे.
जळगाव: खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय, भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव व ग्रंथाली विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, (मू.जे. महाविद्यालय) येथे ग्रंथाली विज्ञानधारा आणि आरोग्ययात्रा उपक्रमांतर्गत भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथील जेष्ठ वैज्ञानिक पद्मश्री डॉ.शरद काळे यांचे आरोग्य आणि विज्ञान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला के.सी.ई. सोसायटीच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.भूपेंद्र केसुर (संचालक भाषा प्रशाळा मू.जे. स्वायत्त महाविद्यालय) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी के.सी.ई. सोसायटीचे सांस्कृतिक व प्रशासकीय समन्वयक श्री.शशिकांत वडोदकर, उपप्राचार्या श्रीमती करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा. श्री.आर.बी. ठाकरे, ग्रंथालीचे समन्वयक श्री. महेश खरे, जैन उद्योग समूहाचे श्री.जयदिप पाटील, विज्ञान शाखा समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा उमेश पाटील उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधतांना भाभा अणुसंशोधन केंद्रात तब्बल ४ दशके संशोधक म्हणून सेवा बजावलेल्या सुप्रसिद्ध वैज्ञानिक, संशोधक, लेखक, कवी पद्मश्री डॉ शरद काळे यांनी विज्ञान व विज्ञानवादी दृष्टिकोन हा मानवाला कशा पद्धतीने डोळस बनवतो हे सोदाहरण स्पष्ट करून सांगितले. जोपर्यंत आपण विज्ञानाला भोगवादी असण्यापेक्षा ज्ञानवादी बनवित नाही तोपर्यंत मानवी जीवनाचा परिपूर्ण कायापालट करू शकत नाही. विज्ञानात असलेल्या कारणांची कार्यमीमांसा आपल्या जीवनातील दिशा ठरवते व त्यायोगे योग्य दिशेने मार्गक्रमण करणे सुलभ होते असे त्यांनी विषद केले. आरोग्य आणि विज्ञान यांचा परस्पर संबंध असून वैयक्तिक आरोग्य चांगले असेल तर सामजिक आरोग्य देखील सुदृढ व निरोगी राहते. पुढे त्यांनी असे प्रतिपादन केले की, पर्यावरण व त्याचे संवर्धन ही आपली जबाबदारी असून त्याची जाणीव ठेवणे हे क्रमप्राप्त आहे. जोपर्यंत आपण भविष्याचा विचार करून पर्यावरण व त्याच्या संदर्भात गांभीर्याने पाऊले उचलत नाहीत,तोपर्यंत संभाव्य धोक्यांबद्दल आपण अनभिज्ञच राहू, त्यासाठी जबाबदारीने व तत्परतेने वैचारिक जनजागृती तसेच कृतीशीलतेने कार्यवाही करणे काळाची गरज आहे. याप्रसंगी आम्ही पर्यावरणाची काळजी घेऊ, भूप्रदूषण करणाऱ्या सिंगलयुज प्लॅस्टिकचा वापर करणार नाही अशी शपथ उपस्थित सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक वर्गाने घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना विज्ञानाच्या प्रयोगातून विज्ञान आणि मानवी जीवन यांचा कार्यकारण भाव सोदाहरण पटवून दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अतुल इंगळे, पाहुण्यांचा परिचय प्रा.ईशा वडोदकर तर आभार प्रदर्शन प्रा.शोभना कावळे यांनी केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक- शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

