भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ आरोग्यास घातक- चेतन पाटील
![]()

भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ आरोग्यास घातक- चेतन पाटील
जळगाव: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कशा पद्धतीने भेसळ केली जाते आणि ती भेसळ कशी ओळखायची याचे प्रात्यक्षिक आज के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आले. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात विकास येथील क्वालिटी कंट्रोल विभागाचे अधिकारी श्री.विजेश परमार तसेच केमिस्ट श्री. चेतन पाटील यांच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी श्री.चेतन पाटील यांनी भेसळयुक्त दूध कसे तयार केले जाते याचे प्रात्यक्षिक करून दाखवून ते कसे ओळखायचे, तसेच हे दूध शरीरास किती घातक आहे याचे विवेचन केले. ते पुढे म्हटले की, सण-समारंभाच्या काळात दुग्धजन्य पदार्थांमध्ये विशेषतः मिठाई,खव्यात कशा पद्धतीने बेमालूमपणे भेसळ केली जाऊन ते मार्केटमध्ये आणून सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी मारले जाते व ते आरोग्यासाठी किती घातक आहे हे सांगून दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणत्या प्रकारचे रिझर्वेटिव्ह टाकले जातात आणि ते कसे ओळखायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांनी पुढे असेही प्रतिपादन केले की जास्तीत जास्त दूध मिळविण्याच्या हव्यासापोटी कोणत्या घातक केमिकल्स वापर करून गाई-म्हशींच्या आरोग्याशी खेळ केला जातो याबाबतचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे होते.तसेच विज्ञान शाखेच्या समन्वयिका प्रा.स्वाती बऱ्हाटे, रसायनशास्त्र विभाग इन्चार्ज प्रा.राजश्री महाजन उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.विजेश परमार व श्री.चेतन पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन प्रा.श्री.राजेश साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रसायशास्त्र विषय शिक्षकांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

