1 min read

खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान अनुयायांच्या मृत्यू प्रकरणी गठीत समितीला मुदतवाढ
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Loading

खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान अनुयायांच्या मृत्यू प्रकरणी गठीत समितीला मुदतवाढ
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा शासकीय यंत्रणेने पूर्णतः नियोजन करून आयोजित केला होता. या पुरस्कार प्रदान सोहळ्या दरम्यान अनुयायांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांची एक सदस्य समिती गठीत करण्यात आली होती. या समितीला मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघाताने नागरिकांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी सदस्य सुनिल प्रभू, जयंत पाटील,अजय चौधरी,यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, या कार्यक्रमाचे अतिशय सूक्ष्म नियोजन करून पाणी, आरोग्य, वाहन, बैठक अशा विविध व्यवस्था श्री सदस्यांना विश्वासात घेवून करण्यात आल्या होत्या. हवामान खात्याने त्या दिवशीचे दि.१६ एप्रिल २०२३ रोजी तापमान ३४ अंश सेल्सियस असेल असे दर्शविले होते ; पण दुर्दैवाने ते अचानक वाढले त्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्या दरम्यान १४ श्री. अनुयायांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली होती. या समितीच्या विनंती वरून समितीला दि.१३ जुलै,२०२३ च्या शासन निर्णयानुसार एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याची कार्यवाही एक सदस्य समितीमार्फत सुरू आहे. मृत्यू झालेल्या १४ व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे ७० लाख रुपये इतके अर्थसाह्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक विशेष बाब म्हणून करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे, अशी माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *