मे महिन्यात महाराष्ट्रात
अवकाळी बातम्यांचा पाऊस!
![]()
मे महिन्यात महाराष्ट्रात
अवकाळी बातम्यांचा पाऊस!
राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष बातमीपत्र.



मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात राजकीय खलबते सुरू झाली. सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देशातील सर्वोच्च नेते श्री. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली. शरद पवार यांचा राजीनामा त्यांच्या निवड समितीने फेटाळला आणि हे अपेक्षितच होते. राजकारणातील एक धुरंधर व्यक्तीमत्व, कोणती खेळी कधी खेळतील याचा अंदाज भल्याभल्यांना घेता आला नाही असे, शरद पवार साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पदावर म्हणजेच त्यांच्या गादीवर अजित दादा पवार किंवा सुप्रिया सुळे यांची वर्णी लागणार अशी शक्यता राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली. अचानकपणे आलेला या बातमीने प्रसार माध्यमाला एक चांगलेच खाद्य मिळाले आणि गेल्या आठवड्यावर याच बातमीने समाज माध्यमावर आणि प्रसार माध्यमाने धुमाकाळ घातलेला आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरावर येत्या काही दिवसातच म्हणजेच आठ ते बारा तारखेच्या दरम्यान निर्णय अपेक्षित आहे. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीला आव्हान देण्यात आले होते आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे त्याचा निकाल सुद्धा या हप्त्यात लागण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. श्री. एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांच्या पात्रतेवरती निर्माण झालेली कायदेशीर प्रक्रिया आहे. जर 16 आमदार अपात्र झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठे उलटापालट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी दिलेला राजीनामा आणि त्यांच्या पदावर दावा करण्यात आघाडीवर असलेले अजित दादा पवार यांच्या भूमीकडे सर्वांचे लक्ष राहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे गटांच्या विरोधात गेला तर सर्व राजकीय पक्ष समीकरणे
बदलू शकतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा येण्याची शक्यता आहे का? अजित दादा पवार आपला एक गट घेऊन भारतीय जनता पक्षाच्या दावणीला आपले संख्याबळ बांधणार आहे का? हे येणारा काळच ठरवेल. महाराष्ट्रात लवकरच येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीबरोबर राज्यात विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येतील असा राजकीय तज्ञांचा आज आहे. महाराष्ट्रातील मातोश्री बंगला, वर्षा हे मुख्यमंत्री महोदयांचे शासकीय निवासस्थान, शरद पवाराचे सिल्वर ओक, आणि सागर बंगला ही राजकारणातील प्रमुख निवासस्थाने आहेत. येथे सध्या वर्तमानपत्रातील प्रतिनिधींचा मुक्काम आहे. राजकीय प्रतिनिधी या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत.
महाराष्ट्रातील उष्णतेमुळे जसजसे वातावरणाच्या तापमानात वाढ होत आहे तसतसं राजकीय अवकाळी वादळ तुफान वेगाने महाराष्ट्रात येत आहे. शरद पवार यांनी दिलेल्या राजीनामामुळे महाविकास आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
माननीय श्री शरद पवार यांच्या बोलण्यावर किंवा त्यांच्या आदेशानुसार आजपर्यंत शांत असलेले राष्ट्रवादीचे आमदार कदाचित उद्या इकडे तिकडे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे. आणि अशी भीती उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजितदादा बद्दल शंका घेऊन फारच गोंधळ माजवला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याची शंका व्यक्त करून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. शरद पवाराच्या आत्मचरित्रात माननीय माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उभे केल्याने महाविकास आघाडी सरकारच्या कार्य क्षमतेविषयी शंका निर्माण केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या अचानक राजीनाम्यामुळे आजची राजकीय परिस्थिती उद्भवली असा दावा खुद्द माननीय शरद पवार यांनी उपस्थित केल्यामुळे महाविकास आघाडीचे पुढील भवितव्य अंधारात आहे अशी ही शंका व्यक्त करत आहे. महाराष्ट्रात जर कोणी सरकार देऊ शकले नाही तर राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे आणि जर राष्ट्रपती राजवट लागली तर महाराष्ट्रामध्ये पुढे होणाऱ्या निवडणुका म्हणजेच महानगरपालिका त्याचबरोबर विधानसभा आणि लोकसभा या अल्पकाळाचाच अपेक्षित आहे.

