अहिल्याबाईंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन गरीब विद्यार्थ्यांना मदत करा : ॲड. तिलोत्तमा पाटील , लोकमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठानचा उपक्रम
![]()
अहिल्याबाईंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन गरीब विद्यार्थ्यांना मदत करा : ॲड. तिलोत्तमा पाटील
लोकमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठानचा उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी : राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या मुलीचा आंतरजातीय विवाह केला, सती प्रथेला विरोध केला, मुलाच्या लग्नात हुंडा घेतला नाही व मुलीच्या लग्नात हुंडा दिला नाही. तसेच मुस्लिम समाजाच्या मशिदीला मदत केली, बालविवाह प्रथा बंद केली आणि देशभरातील लाखो शेतकरी, गरीब व वंचितांना आपल्या स्वतःच्या पैशातून मदत व सहकार्य केले. अहिल्याबाईंच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या नावाने अमळनेरमध्ये गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन ॲड. तिलोत्तमा पाटील यांनी केले.
लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान (अमळनेर) यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अशोक पवार होते.
अहिल्याबाईंचा जीवनपट भाषणातून उलगडला
यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांसाठी महेश्वर सहलीचे आयोजन करण्याचा निर्णय मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांनी जाहीर केला. तसेच त्यांनी आपल्या भाषणातून अहिल्याबाई होळकर यांचा जीवनपट सविस्तरपणे मांडला.
मान्यवरांची मनोगते
याप्रसंगी कमल अक्का, अशोक पाटील, रियाज मौलाना, ॲड. रज्जाक शेख, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, अहिराणी साहित्यिक शरद धनगर आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सेवानिवृत्त पर्यवेक्षकएस. सी. तेले यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, व्हाईस आँफ मीडिया महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्धी प्रमुख बापूराव ठाकरे, भास्करराव बोरसे, संजय पाटील, चिंधू वानखेडे, बापू सांगोळे सर, सईद तेली, मनोज मोरे, दिलीप खांडेकर, बी. एल. सैंदाणे, गोविंदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



