अशुभाची छाया-
निधीची माया!
![]()
अशुभाची छाया
निधीची माया!
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर बोलू तेवढे कमी व लिहू तेवढे थोडे अशी अवस्था निर्माण झाली आहे. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी व नऊ – नऊ मंत्री अशी राज्याची स्थिती आहे. म्हणूनच माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारच्या नाकी नऊ आले आहे असे उदगार काढले आहेत.
मंत्री मंडळ दुसरा विस्तार झाला व दहा दिवस झाले तरी अद्याप खाते वाटप झाले नाही पण मंत्र्याला दालने देण्यात आली व बंगल्याचे वाटप करण्यात आले. राज्यातील उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेबांना मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 602 हे कार्यालय प्राप्त झाले आणि तेथेच माशी शिंकली. आपण सर्व सामान्य माणसे शुभ-अशुभ असे संकेत मानतो असे नव्हे तर राजकारणातील दादा सुध्दा शुभ – अशुभ संकेत पाळतात अशी चर्चा मंत्रालयात चालली आहे.
मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 602 नंबर केबिन नव्या उपमुख्यमंत्री साहेबांना देण्यात आली. मात्र अजित पवार यांनी ही केबिन नाकारली आहे अशी चर्चा आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेली 602 नंबरची केबिन अशुभ मानली जाते. 602 या केबिनमधून आतापर्यंत काम करणाऱ्या कोणत्याही मंत्र्याला बढती मिळालेली नाही, उलट त्याला राजकीय जीवनात अनेक संकटाला सामोरे जावे लागले आहे अशी अजितदादांची
समजूत आहे. याच भावनेतून अजित पवार यांनी ही केबिन नाकारल्याची चर्चा आहे. त्यानुसार सध्या मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अजित पवार यांची केबिन तयार करण्याच्या कामाने वेग घेतला आहे.
मंत्र्याची केबीन व बंगले नेहमीच चर्चेत असतात. माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड या मंत्रालयाच्या समोरच असलेल्या बी 4 या बंगल्यात शालेय शिक्षणमंत्री असताना राहत होत्या त्याचे कारण म्हणजे त्यांच्या वडिलांना मंत्री असताना तोच बंगला मिळाला होता व त्यानंतर ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते व आता सुद्धा वर्षाताई गायकवाड यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले आहे. हा योगायोग की बंगल्याचा शुभ संकेत अशीही चर्चा चालू आहे. मंत्रालयासमोर बंगला असल्याने अनेक कार्यकर्ते आपसूकच बंगल्यावर उपस्थीत असायचे.अशीही कार्यालय व बंगल्याची आख्यायिका आहे म्हणूनच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असणारी 602 नंबरची केबिन अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. मंत्रालयातील ही केबिन अशुभ असल्यामुळे संबंधित नेत्यांना लाभत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात केली जाते. यापूर्वी 602 नंबरची केबिन एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर आणि अजित पवार यांना मिळाली होती. एकनाथ खडसे यांची गेल्या काही वर्षांतील राजकीय कारकीर्द खडतर ठरली आहे चौकशीला सामोरे जावे लागले होते. तर अजित पवार यांनीही राजकीय जीवनात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. गेल्यावेळी 2019 मध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, हे सरकार औटघटकेचे ठरले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार कोणताही धोका पत्कारायला तयार नसल्याची चर्चा रंगली आहे. अशी चर्चा आहे. या शुभ अशुभ संकेता संदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही पण चर्चा आहे. चर्चा आहे म्हणून बातमी आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते गेल्यास सर्वच आमदारांना अजितदादांची मर्जी राखावी लागणार आहे. महाविकास आघाडी सरकार मध्ये उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री असताना निधी वाटपामध्ये समानता नव्हती अशी आरोळी शिवसेना आमदारांनी ठोकली होती. अजित दादा आता “अर्थकारण” करताना अशुभाची छाया की निधीची माया ठेवतात हे लवकरच कळेल!

