अमळनेर साहित्य संमेलन शिक्षकांना,मुलांना साने गुरुजी शी जोडणारे व्हावे- हेरंब कुलकर्णी
![]()

अमळनेर साहित्य संमेलन शिक्षकांना,मुलांना साने गुरुजी शी जोडणारे व्हावे (हेरंब कुलकर्णी)
यावर्षी साहित्य संमेलन अंमळनेर येथे होते आहे. वर्धा येथे गांधींच्या कर्मभूमीत मागचे संमेलन झाले आता साने गुरुजींचे कर्मभूमीत संमेलन होते आहे.ही समाधानाची गोष्ट आहे.पण वर्धा संमेलनात गांधी म्हणून काही विशेष वेगळेपण नव्हते.सुरुवातीला असे वाटले होते की गांधी,विनोबा आणि साहित्य असे मोठ्या प्रमाणात असेल. पण तसे घडले नाही की जिल्ह्यातील लोकही फार आले नाहीत.
त्यामुळे आता किमान साने गुरुजी कर्मभूमीत हे संमेलन होताना साने गुरुजींची प्रेरणा जागवायला हवी. याविषयी काही सूचना आहेत
१)संमेलन अध्यक्ष हा साने गुरुजींचा अभ्यासक व शक्यतो शिक्षक असावा.शिक्षकांना सन्मान द्यावा (कृपया यातून मी माझे नाव सुचवत नाही,गैरसमज नको..!!!)
२) वर्धा संमेलनात गर्दी झाली नाही. इथे जर शिक्षक समूदाय लक्ष्य केला तर धुळे, जलगावं जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षक जमतील. त्यासोबत लहान मुले,बालसाहित्य यावर फोकस दिला तर मुलेही जमतील.
३) साने गुरुजींची प्रेरणा आजच्या शिक्षकात कशी संक्रमित करता येईल ? असा दृष्टिकोन घेवून परिसंवाद, प्रयोगशील शिक्षकांचे सादरीकरण, मुलांमधील संवेदनशीलता वाढविणारे उपक्रम, शिक्षणावर लिहिलेल्या कवितांचे स्वतंत्र कविसंमेलन,मराठीतील शिक्षण विषयक पुस्तके असे एक दिवस पूर्ण ठेवले तर
राज्यातील शिक्षक मोठ्या संख्येने गुरुजींच्या कर्मभूमीत जमतील.
४) शिक्षणविषयक मराठीत १०० पेक्षा जास्त पुस्तके आहेत. मात्र ती शिक्षकांना माहीत नाहीत. (त्यासाठी मी परिचय करून देणारे बखर शिक्षणाची पुस्तक लिहिले). ही प्रेरणादायी पुस्तके परिचित होतील यासाठी सवलतीच्या दरात ते संच देणे,त्यावर चर्चा घडविणे, चांगल्या शाळांच्या उपक्रमाचे प्रदर्शन घडविणे हे करायला हवे.
५)साने गुरुजींनी ११३ पुस्तके लिहिली पण फक्त श्यामची आई च माहीत आहे. गुरुजी एक साहित्यिक म्हणून पुढे येतील असे परिसंवाद असावे.
६) गुरुजींचे लहान मुलांचे प्रेम बघता मुलांसाठी विविध उपक्रम असावेत. बालसाहित्य प्रदर्शन स्वतंत्र करायला हवे.
७) साने गुरुजी वसतिगृहाचे अधिक्षक होते.त्यांनी अधीक्षक मुलांना कसे प्रेमाने बदलून दाखवतो हे दाखविले. आज महाराष्ट्रात हजारो आश्रमशाळा वसतिगृह आहेत. तेथील अधिक्षक वर्ग शिक्षा म्हंजे शिस्त या मानसिकतेत आहे. त्यांना साने गुरुजी हा त्यांचा मूळ पुरूष आहे, हे सांगण्यासाठी गुरुजींनी मुलांसोबत केलेले वर्तन अशी कोटी पुस्तिका प्रसिद्ध करून असे संवेदनशील आदर्श अधिक्षक यांना पुरस्कार द्यायला हवे


असे खूप काही करता येईल
यात साहित्य कुठे आहे ? असेही विचारले जाईल.पण नाहीतरी आजवर च्या रूढ संमेलनाने तरी काय साध्य केले आहे ?
यातून किमान शिक्षक आणि मुले गुरुजींशी जोडली गेली तरी ते मोठे यश व उपलब्धता असेल.
महामंडळाने या सूचनांचा जरूर विचार करावा..आम्ही नियोजनात मदत करू
हेरंब कुलकर्णी

