अतुलनीय कर्तुत्व, व्यक्तित्व, प्रभुत्व याचा समुच्चय म्हणजे राजे शिवाजी!!
![]()

अतुलनीय कर्तुत्व, व्यक्तित्व, प्रभुत्व याचा समुच्चय म्हणजे राजे शिवाजी!!
ह्या भूतलावर खूप राजे झालेत परंतू छत्रपती सारखा राजा लाखात एक होतो.पराक्रमाची ,संस्काराची, नैतिकतेची, राष्ट्राभिमानाची, तेजस्वितेची खाण असलेल्या घराण्यात शिवबा जन्मले.गुलामीने लचके तोडणारे सोळावे शतक त्यात शिवबा आले. माता जिजाऊ जिने लहानपणापासून युद्धाचे व राज्यकारभाराचे ज्ञान मिळविले होते. अंगाअंगात स्वाभिमान, राष्ट्रतेज असलेल्या मातेचा शिवबा पुत्र होते.आपल्या कर्तुत्वाने सरदारकी गाजविणारे पराक्रमी शहाजी राजे आदिलशाही व निजामशाहीत त्यांचे वेगळे वजन होते. स्वराज्य गुलामीतून बाहेर आणण्यासाठी राजे शहाजी यांनी स्वराज्य साकार करण्याची चेतना जिजाऊ व शिवबाच्या मनात रूजविली. पुणे, सुपे हया भूमीचा ओसाड समजला जाणारा तुकडा जहागिरी मिळाला असतांना ती भूमी स्वतः नांगर फिरवून भूमीत जगण्यासाठी धैर्याचे तर माणसात अस्मितेचे, कर्तृत्वाचे बीज रोवले.अंधविचारात गुरफटून ठेवणाऱ्या भूमीला काम करणाऱ्या हाताचे बळ दिले. शिवबा राजासारखा जनतेसमोर वागला नाही. एक कर्तृत्ववान सेवक म्हणून जगला.त्यामूळे येथील प्रत्येक मावळा म्हणजे सैनिक हा शिवबासाठी लढला. अतूट मैत्रीचा झरा असलेला शिवबा कधी लाचारीने शत्रू समोर झुकला नाही. औरंगजेबाला स्वराज्यात फिरकू दिले नाही. शिवबा जनतेच्या हृदयातील धगधगणारा श्वास होता. अंहपणाचा साधा लवलेश नसलेला राजा सर्वांचा प्राण होता. अतिशय चतूर, संयमी, प्रतिभेचा धनी राजा शिवबा होता. अनेक पराक्रम केले त्यातून अलौकिक बुद्धीमत्ता शिवबाची दिसून येते.राजाचे सर्वच प्रदेशाची अचूक माहिती ठेवणे हे चौफेर ज्ञान असल्याचे प्रतिक आहे. जगात प्रसिद्ध अशी त्यांची हेरयंत्रणा होती. 14 भाषा अवगत असणारा बहिर्जी नाईक हे रामोशी जातीतून आलेले नवरत्न म्हणजे बहुरूपी व्यक्तीमत्व..कोणत्याही युद्धापूर्वी शत्रूची कमजोरी हेरून गनिमी कावा योजून काम यशस्वी करण्याची निती भल्याभल्या राजांना जमली नाही. स्वजातीय विरोधक, कर्मठ विचार ठेवणारे विरोधक, परकिय शत्रू अशा तिन्ही विरोधकांचा शिवबाने सामना केला. मित्र बनविण्याची कला हि त्यांची संघटन कौशल्याची भिस्त होती. स्वत: च्या कामापेक्षा राजासाठी मरणारी, जीव की प्राण देणारी माणसे शिवबाने उभी केली. विरोधकांनी इतिहास लिहितांना बेइमानी केली. परंतू शिवभारत ह्या पुस्तकात परमानंदाने अचूक माहिती दिली. विदेशी इतिहासकार यांनी अनेक पत्रव्यवहार, पुरावे देवून तसेच वा. सी. बेंद्रे व इतर स्वराज्य चिंतक इतिहासकारांनी खरा इतिहास मांडला. काही खोटे इतिहासकार त्याच्या पूर्वजांच्या कंड्या, वर्चस्व शिवबाने चालू दिले नाही तसेच सर्वांना समान न्याय दिल्याने दुखावले परंतू राजाने मानवता धर्म सोडला नाही. स्री षुरूष समानता जपली.स्री हि भगवंताची उत्कृष्ठ कलाकृती मानून मातेसमान दर्जा दिला. महात्मा फुले झाले नसते तर शिवबा अजूनपर्यंत आम्हा कळाले नसते. थोर उपकार झाले जोतिराव यांचे त्यांनी प्रथम जयंती साजरी करून शिवबाच्या कर्तृत्वाला अभिवादन केले.
लेखक-सोपान भवरे सर
मराठी लाईव्ह न्युज अतिथी संपादक अमळनेर

