स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात विधानपरिषदेच्या १०० वर्षांच्या परंपरेला अधिक समृद्ध करण्याचा संकल्प — डॉ. नीलम गोऱ्हे*
![]()
*स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात विधानपरिषदेच्या १०० वर्षांच्या परंपरेला अधिक समृद्ध करण्याचा संकल्प — डॉ. नीलम गोऱ्हे*
मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) — “भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या प्रवासात मागील काही वर्षांत देशात व राज्यात लक्षणीय बदल झाले आहेत. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका यशस्वीरीत्या पार पडल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीला उल्लेखनीय यश मिळाले. लोकशाही प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग ही आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे,” असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, “पायाभूत सुविधांचा विकास, नवे कायदे, न्यायसंविधा बळकट करण्यासाठीची पावले, महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यात राबवलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना, दहशतवाद व आतंकवाद रोखण्यासाठीचे कठोर कायदे, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि क्रीडा क्षेत्रातील भारताची लक्षणीय प्रगती — या सर्व घडामोडींमुळे नागरिकांच्या हितासाठी कार्य करणारे सरकार ही भावना अधिक दृढ झाली आहे.”
विधिमंडळाच्या उच्च परंपरेनुसार आज विधानभवनात माननीय सभापती श्री. राम शिंदे यांच्या हस्ते, तसेच माझ्या आणि विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. “या वेळी आम्ही संकल्प केला की, विधानपरिषदेच्या १०० वर्षांच्या परंपरेला अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहू. या अनुषंगाने ‘१०० वर्षे – १०० भाषणे’ आणि ‘विधानपरिषदेत झालेली विधेयके’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन पुढील दोन महिन्यांत करण्यात येणार असून, या पुस्तकांवरील काम वेगाने सुरू आहे,” असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
“आपल्या महान परंपरेचे जतन आणि संवर्धन करत, प्रगतीचा नवा मार्ग आखण्याचा संकल्प आज आपण सर्वांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि सर्व मान्यवरांच्या वतीने मी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते,” अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

